BJP Hindi Language Controversy : गेल्या दशकभरात उत्तर व मध्य भारतातील हिंदी पट्ट्यात चांगलं बस्तान बसविणाऱ्या भाजपामध्ये एक लक्षणीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षातील केंद्र आणि राज्य पातळीवरील नेतृत्व अधिकाधिक हिंदी भाषिक होत असल्याचं दिसून येत आहे. ११ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चेन्नईमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपा व अण्णा द्रमुकच्या युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे हिंदीमधूनच दिली. विशेष बाब म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकार हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपाला आधीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार जाणूनबुजून राज्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

भाजपाचे कोणकोणते नेते हिंदीत बोलतात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मातृभाषा गुजराती आहे. मात्र, संसद असो वा सार्वजनिक व्यासपीठ अमित शाह त्यांची सर्व भाषणे व विधाने हिंदीमधूनच करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील गुजराती असून, ते हिंदी भाषेचा वापर करताना दिसून येतात. काही वेळा ते स्थानिक भाषेला पर्याय म्हणून इंग्रजीतूनही बोलतात. यावरून असं लक्षात येतं की, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत.

भाजपाच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हेच कधी कधी इंग्रजी भाषेचा वापर करतात. पक्षाचे इतर मुख्यमंत्री – उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ, राजस्थानमधील भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशातील मोहन यादव, उत्तराखंडमधील पुष्कर सिंग धामी, हरियाणातील नायब सिंग सैनी, छत्तीसगडमधील विष्णू देव साई, गुजरातमधील भूपेंद्र पटेल व ओडिशातील मोहन चंद माझी हे फक्त हिंदी किंवा त्यांच्या प्रादेशिक भाषेतूनच बोलताना दिसून येतात.

आणखी वाचा : केंद्रीय मंत्र्यांच्या ‘त्या’ विधानामुळे ‘एनडीए’मध्ये गोधळ का उडाला?

भाजपाच्या ‘या’ मंत्र्यांची इंग्रजी भाषेवर पकड

केंद्रीय मंत्रिमंडळातील काही भाजपा मंत्र्यांची इंग्रजी भाषेवर मजबूत पकड आहे. त्यामधील बहुतांश मंत्री हे माजी प्रशासकीय अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापक व राजकीय घराण्यांमधील आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे इंग्रजीत बोलण्यात तरबेज आहेत.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात भाजपातील चित्र वेगळं होतं. तेव्हाचे अनेक नेते द्विभाषक (हिंदी-इंग्रजी) किंवा बहुभाषक होते. इंग्रजी भाषेतूनही ते सहजपणे बोलत असत. वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, एम. वेंकय्या नायडू, अनंत कुमार व अरुण शौरी यांची इंग्रजी भाषेवर मजबूत पकड होती.

हिंदी भाषा ठरतेय इंग्रजीला पर्याय?

दरम्यान, या भाषिक बदलावर वक्तव्य करताना भाजपातील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, “गेल्या दशकभरापासून सर्वसामान्यांना इंग्रजी भाषिक व उच्चभ्रू वर्गाविषयी नाराजी वाटू लागली आहे. कारण- हे लोक नेहरूंच्या काळापासून समाजात वर्चस्व गाजवत आलेले आहेत. लोकांना आता इंग्रजीत बोलणारे नव्हेत, तर फक्त त्यांच्या स्थानिक भाषेतूनच बोलणारे नेते हवे आहेत. त्यामुळेच आज उच्चभ्रू वर्गाला राजकारणात यश मिळवणं कठीण झालं आहे. भाजपाचं सध्याचं नेतृत्व हिंदी पट्ट्यातील जनतेच्या अपेक्षांशी सुसंगत आहे, जिथे भाजपा मजबूत स्थितीत आहे.”

भाजपाच्या दुसऱ्या एका नेत्यानं सांगितलं, “कधी काळी आमच्या पक्षातील नेतृत्व प्रामुख्यानं सवर्णांमधून होतं. मात्र, आता त्यात मोठ्या प्रमाणावर इतर मागासवर्गीय समुदायातील नेतृत्वाचा समावेश झाला आहे. त्यामुळे भाजपा हा भूमिपुत्रांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पक्षाचं सांस्कृतिक रूपही बदललं आहे.” दरम्यान, हिंदी पट्टा हा भाजपासाठी मतदानाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा प्रदेश आहे. कारण- या भागातून पक्षाला निवडणुकीत मोठं यश मिळाल्याचं दिसून येतं. लोकसंख्येच्या प्रमाणात या भागाचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव असल्याने भाजपाला त्याचा फायदा होत आलेला आहे.

हिंदीसाठी एवढा आटापिटा कशासाठी?

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भाजपाचे मित्रपक्ष व त्यांचे प्रतिस्पर्धीही हिंदी भाषक आहेत. समाजवादी पार्टीचे दिवंगत नेते मुलायम सिंग यादव हेदेखील त्यांची भाषणं हिंदीमधूनच करीत असत. त्यांचे पुत्र व सध्याचे ‘सपा’ अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचं शिक्षण इंग्रजीतून पूर्ण केलं आहे. असं असूनही त्यांनीही हिंदी भाषेचाच वापर सुरू केला आहे. बिहारमध्ये आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पुत्र तेजस्वी यादव, तसेच त्यांचे विरोधक व भाजपाचे मित्र नितीश कुमार हेदेखील हिंदी भाषेचाच वापर करताना दिसून येतात.

हेही वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर कोण काय म्हणालं?

काँग्रेस नेत्यांना हिंदीत बोलण्यात अडचणी?

भाजपाचे छोटे सहयोगी पक्ष – आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी, अपना दल (सोनेलाल) च्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल व एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान हे मात्र त्यांच्या भाषणात हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर करतात. काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, काँग्रेसपेक्षा आता भाजपा, आरजेडी, जेडीयू व समाजवादी पार्टीचे नेते जास्त प्रमाणात हिंदीतून बोलत आहेत. “काँग्रेस मात्र उलट दिशेने गेली असून, पक्षाचं नेतृत्व आता प्रामुख्यानं हिंदीतर भागात केंद्रित झालं आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गटनेते पश्चिम बंगालचे अधीर रंजन चौधरी होते, ज्यांना हिंदी भाषेतून सहसा बोलता येत नव्हते. आता राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. पण, केरळचे खासदार के. के. वेणुगोपाल, आसामचे खासदार गौरव गोगोई व खासदार शशी थरूर हे हिंदी भाषेचा पुढाकार घेणारे आहेत,” असे एका भाजप नेत्याने सांगितले.

हिंदी ठरतेय भाजपासाठी फायदेशीर?

“राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व जयराम रमेश हे काँग्रेसचे दोन प्रमुख नेते आहेत. गांधी कुटुंब सोडल्यास काँग्रेसचं नेतृत्व आता दक्षिण भारतातील असल्यानं त्यांच्या हिंदीतील भाषणांचा जनतेवर फारसा प्रभाव पडत नाही”, असं भाजपाच्या एका नेत्यानं म्हटलं आहे. हिंदी भाषेकडे असलेला वाढता कल उत्तर आणि मध्य भारतात भाजपासाठी फायदेशीर ठरत आहे. कारण- या भागातील जवळपास सर्व मतदार हिंदी भाषक आहेत, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तमिळनाडूतील स्टॅलिन सरकारनं भाजपाच्या त्रिभाषिक धोरणाला विरोध केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही इयत्ता पहिलीपासूनच्या पाठ्यक्रमात हिंदी ‘अनिवार्य’ करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातून या सक्तीला विरोध होतो आहेच; पण कोणत्या राजकीय नेत्यांनी विरोध केला आणि कोणी केला नाही, याकडेही लोकांचे लक्ष आहे. या धोरणाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.