नाशिक : शेतीच्या प्रश्नांवर उलटसुलट चर्चा होत असली तरी दिंडोरी या कृषिप्रधान लोकसभा मतदार संघात भाजपने कौशल्यपूर्वक आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. बहुसंख्य शेतकरी मतदार असलेल्या दिंडोरीचे शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीसाठी ‘बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ’ असे वर्णन केले जात असे. परंतु, त्यांच्याच पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन भाजपकडून बेरजेचे राजकारण झाले. त्यामुळे राष्ट्रवादीला आजवर कधीही हा मतदारसंघ ताब्यात घेता आला नाही. मागील निवडणुकीत प्रथमच लोकसभेत पोहोचलेल्या डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्रिपद देत भाजपने बालेकिल्ल्यात पाळेमुळे घट्ट करण्याचे धोरण ठेवले. त्याला आता शिवसेना-राष्ट्रवादीतील दुफळीतून रसद मिळणार आहे. या दोन्ही पक्षांचे सर्वच आमदार सत्तेत सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीची वाट खडतर झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे विरोधकांना भाजपला तुल्यबळ लढत देईल, असा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे.

येवला, चांदवड, दिंडोरी, निफाड, नांदगाव आणि कळवण-सुरगाणा या विधानसभा मतदार संघांचा मिळून तयार झालेला अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे. दीड दशकांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेला दिंडोरी हा पूर्वी मालेगाव लोकसभा मतदारसंघ होता. जुन्या मतदार संघात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँंग्रेसला आलटून-पालटून यश मिळायचे. कधीकधी भाजपने अस्तित्व दाखवले होते. १९८९ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाचे हरिभाऊ महाले हे विजयी झाले होते. तर काँग्रेसला झेड. एम. कहांडोळे यांच्या माध्यमातून १९९१ आणि १९९८ मध्ये ही जागा मिळाली होती. १९९६ च्या निवडणुकीत मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलले. कचरु राऊत यांनी विजय मिळवला. पुनर्रचनेआधी म्हणजे २००४ च्या निवडणुकीत भाजपने या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदार हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट देऊन भाजपने जनता दलाकडून ही जागा खेचून घेतली. तेव्हापासून आजतागायत पुनर्रचित दिंडोरी या मतदार संघावर या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. २००९ आणि २०१४ मध्ये पुन्हा यश मिळवत चव्हाण यांनी हॅट्रीक साधली. २०१९ च्या निवडणुकीत मात्र भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करुन विद्यमान खासदार असतानाही चव्हाण यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविण्याची खेळी खेळत शरद पवार यांचा अंदाज विफल ठरवला.

rajnath singh modi shah
२०२५ मध्ये अमित शाह पंतप्रधान होणार? अरविंद केजरीवालांच्या दाव्यावर राजनाथ सिंहांचं उत्तर; मोदींच्या निवृत्तीबाबत म्हणाले…
come with us will take hindutva forward uddhav thackeray appeal  bjp sangh workers
आमच्याबरोबर या, हिंदुत्व पुढे नेऊ! उद्धव ठाकरे यांची भाजप, संघ कार्यकर्त्यांना साद  
Sunil Tatkare, advice, Hemant Godse,
संभ्रम करणारी विधाने टाळावीत, सुनील तटकरे यांचा हेमंत गोडसे यांना सल्ला
BJP silence on Mayawati sparks discussion
मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण
BJP in Rae Bareli Amit Shah Rahul Gandhi in Rae Bareli Lok Sabha seat
राहुल गांधींविरुद्ध उभे ठाकलेल्या भाजपा उमेदवाराला पाठिंबा द्यावा की नाही? पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या मनात टू बी ऑर नॉट टू बी
Sharad Pawar group is preparing a complaint against J P Gavit for use of photographs of Mahavikas aaghadi leaders
मविआ नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर, जे. पी. गावितांविरोधात तक्रारीची शरद पवार गटाकडून तयारी
Satej Patil, Sanjay Mandalik,
उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन

हेही वाचा : आंध्र प्रदेश : वाय एस शर्मिला राज्यव्यापी दौऱ्यावर, काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार!

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील अविश्वास ठरावावेळी रुग्णालयात असताना मतदानासाठी हवाई रुग्णवाहिकेने दिल्ली गाठणारे खासदार, अशी हरिश्चंद्र चव्हाण यांची ओळख होती. सलग तीनवेळा निवडून आल्याने पहिल्या मोदी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाचीही अपेक्षा होती. मात्र मंत्रिपद दूर, पक्षाने त्यांना उमेदवारीही नाकारली. दुसरीकडे नवख्या डॉ. भारती पवार यांना केंद्रात आरोग्य राज्यमंत्रिपद बहाल करुन स्वकियांना धक्का दिला. करोना काळात आरोग्य विभागाची जबाबदारी व पक्षीय कामासाठी देशात भ्रमंती करण्यात डॉ. पवार यांनी कुठलीच कसर ठेवली नाही. आगामी निवडणुकीसाठी माजी खासदार चव्हाण, नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी अशा काही इच्छुकांनी मोर्चे बांधणी केली आहे. डॉ. पवार यांच्याविषयी पक्षातील काही घटक नाराजीचा सूर आळवतात. शिवसेना, राष्ट्रवादीतील फाटाफूट पथ्यावर पडेल, असा भाजपचा समज असला तरी निवडणुकीत यशाची वाटचाल नक्कीच सोपी नाही.

हेही वाचा : भाजपची आता राम यात्रा, महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी

या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार तर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे. सेना, राष्ट्रवादीतील घाऊक पक्षांतराने विरोधी महाविकास आघाडीचा कुणी लोकप्रतिनिधी या मतदारसंघात राहिलेला नाही. ठाकरे गटाला या जागेत रस नाही. मध्यंतरी काँग्रेसने या जागेवर दावा सांगितला होता. परंतु, जागा वाटपात ती पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे राहण्याची चिन्हे आहेत. गतवेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. मागील निवडणुकीत भाजपने सुमारे दोन लाखाच्या फरकाने विजय मिळवला होता. माकपकडून प्रत्येक निवडणुकीत एक लाखाच्या आसपास मते घेतली जातात. विरोधकांकडे सक्षम उमेदवाराची वानवा आहे. कांदा निर्यात बंदीविरोधात आंदोलनात रस्त्यावर उतरुन शरद पवार यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात कांदा उत्पादकांमध्ये असलेल्या नाराजीचे रुपांतर मतपेढीत झाल्यास आणि महाविकास आघाडीला साथ देण्याची भूमिका असल्याने माकपचीही मदत मिळाल्यास मतदारसंघात चमत्कार होऊ शकतो. याच मतदारसंघातील सावरपाडा या गावातील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतच्या नावाची चर्चाही सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. राष्ट्रवादी जुने सहकारी हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावरही जाळे टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा : आसाम : भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत संघर्ष, प्रदेशाध्यक्ष बोराह जखमी!

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात येवला, दिंडोरी, निफाड, व कळवण-सुरगाणा हे चार मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत. तर चांदवड भाजप आणि नांदगाव शिवसेना शिंदे गटाकडे आहे.

मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

डॉ. भारती पवार (भाजप) – ५,६७,४७०

धनराज महाले (राष्ट्रवादी) – ३,६८,६९१