Amit Shah in MP: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वादग्रस्त विधाने करण्यासंदर्भात इशारा दिला आहे. अमित शाहांनी पक्षातील नेत्यांना उद्देशून म्हटले की, “भाषणावर संयम हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे आणि कधीकधी गप्प राहणे शहाणपणाचे असते.” मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील पचमढी येथील तीन दिवसांच्या भाजपा प्रशिक्षण शिबिरात हे दोन्ही मंत्री बोलत होते, तेव्हा त्यांनी हे विधान केले. मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्यांच्या विरोधात लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर विजय शाह यांनी माफी मागितली होती. कर्नल सोफिया कुरेशी या ऑपरेशन सिंदूरवर दररोज मीडिया ब्रीफिंग करणाऱ्या टीमचा भाग होत्या.
शनिवारी अमित शाह मध्य प्रदेशातील पचमढी या हिल स्टेशनवर पोहोचले.
भाजपाचे तीन दिवसांचे (१४ ते १६ जून) प्रशिक्षण शिबिर इथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट खासदार, आमदार आणि मंत्र्यांना पक्षाची विचारधारा, इतिहास आणि आचारसंहिता मार्गदर्शक तत्त्वांची जाणीव करून देणे असे आहे. शिबिराची सुरुवात ‘वंदे मातरम्’ म्हणत झाली. त्यानंतर अमित शाह यांनी आमदार आणि खासदारांना संबोधित केले. यावेळी शाह म्हणाले की, चूक एकदा होऊ शकते, पण ती पुन्हा करू नये.
“चुका होतात पण त्या पुन्हा होऊ नयेत”, असे अमित शाह यांनी त्यांच्या मुख्य भाषणात राज्यातील मंत्र्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करताना सांगितले. “कोणताही नेता वरिष्ठ किंवा अनुभवी झाला तरी त्याने नेहमी विद्यार्थी म्हणूनच राहिले पाहिजे”, असेही ते म्हणाले.
राज्याचे कॅबिनेट मंत्री करण वर्मा यावेळी म्हणाले की, “केंद्रीय मंत्री शाह यांच्या वक्तव्याचा उद्देश विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत होता. “त्यांनी मान्य केले की चुका कोणाकडूनही होऊ शकतात, मात्र त्याच चुकांची पुनरावृत्ती अस्वीकार्य आहे”, असे वर्मा म्हणाले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, “अतिरेकी प्रतिक्रिया आणि मौखिक संयमाचा अभाव पक्षाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.” “९० टक्के राजकीय हानी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यामुळे होते. कधीकधी शांत राहणे शहाणपणाचे असते”, असेही ते म्हणाले. “राजकारणात भाषणावेळी संयम हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. विशेषतः अशा काळात, जिथे प्रत्येक शब्द हा वाढवून सांगितला जातो” असे ते म्हणाले. यावेळी शाह यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यापूर्वी विचार करण्याचे आणि त्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले.
- भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधानं
- कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा भाजपा नेते कुंवर विजय शाह यांचा उल्लेख
- शत्रुत्व आणि द्वेष पसरवल्याच्या कारणावरून शाह यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश
- सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले
- अशा मंत्र्यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करीत नाही ही शोकांतिका आहे, अशी खंत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली
- अमित शहांनी दिला आहे इशारा
गेल्या महिन्यात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात मीडिया ब्रीफिंगदरम्यान विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबतच्या वक्तव्यामुळे विजय शाह यांच्यावर टीका झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना विजय शाह म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांच्या बहिणीला जबाबदार असलेल्यांविरुद्ध बदला घेण्यासाठी लष्करी विमानात पाठवले होते.

“दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींना विधवा केले म्हणून मोदीजींनी त्यांच्या समुदायातील एका बहिणीला त्यांचेच कपडे फाडण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाठवले; त्यांनी आमच्या हिंदू बांधवांना मारण्यापूर्वी आम्ही त्यांच्या स्वतःच्या बहिणीला त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यासाठी पाठवून दहशतवादाला उत्तर दिलं आहे”, असे त्यांनी स्पष्टपणे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंदर्भात म्हटले होते. १२ मे रोजी इंदूरमधील रायकुंडा गावात एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. त्यांचे हे विधान सांप्रदायिक, लिंगभेदी आणि अपमानजनक असल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. त्यानंतर विजय शाह यांनी आपण केलेल्या विधानाबाबत १० वेळा माफी मागण्यास तयार आहे असेही म्हटले होते.
दरम्यान, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कर्नल कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आणि चुकीची भाषा वापरल्याबद्दल मंत्र्यांना फटकारले आणि त्यांच्या विरुद्ध शत्रुत्व आणि द्वेष पसरवल्याच्या कारणावरून प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. विजय शाह यांच्या या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयानेही टीका करताना म्हटले की, जनतेचं नेतृत्व करणाऱ्या पदावर असलेल्या व्यक्तीने त्यांच्या भाषणादरम्यान संयम बाळगावा.
विजय शाह काय म्हणाले होते?
मंत्री विजय शाह यांनी एका सभेत बोलताना कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’ असा केला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत देशवासीयांना कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री वेळोवेळी माहिती देत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना सुनावलं होतं