मधु कांबळे
नांदेडः महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत, असा हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चढविला.या देशातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर व केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांवर बोलताना ,राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये अचानक कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिसकावून घेतले.
हेही वाचा >>>अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील आजच्या दिवसातील भारत जोडो पदयात्रेच्या संध्याकाळच्या सभेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>एस.एम.जोशी सभागृहाची दुर्दशा काँग्रेसने फलक-रोषणाईने झाकली!
राहुल गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आता महाराष्ट्रात आली आहे. रोज सात आठ तास आपण चालतो. त्यावेळी युवक, महिला, शेतकरी, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. भारत समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते व त्यावरून राज्याची अवस्थाही समजते.
हेही वाचा >>>निमिषा सुथार यांच्या रुपाने गुजरातमध्ये भाजपाला मिळाला आदिवासींचा नेता
सरकारी उद्योग खासगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोक-या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो. देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पाहात आहे. पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फिरवले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या धोरणाचा समाचार घेतला.
कोणालाही घाबरू नका, मनातील भीती काढून टाका. जो ही भीती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही म्हणून मनातून भीती काढून टाका असे आवाहन शेवटी राहुल गांधी यांनी केले.