सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : कॉग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्यासाठी कॉग्रेसकडे सोपविलेला मतदारसंघ जागा वाटपात पुन्हा राष्ट्रवादीने परत घ्यावा अशी व्यूहरचना केली जात आहे. या मतदारसंघातून साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असावेत, अशी पेरणी केली जात आहे.

या अनुषंगाने ‘लोकसत्ता’ शी बोलताना दांडेगावकर म्हणाले, या पूर्वी अनेक पदांवर काम केले आहे, लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शिवसेनेचे हेमंत पाटील करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून हिंगोली लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

हेही वाचा… ‘मेक इन गडचिरोली’ उपक्रम भाजपाच्याच अंगलट!

हेमंत पाटील हे जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर देशातील साखर संघांचे नेतृत्व जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे आहे. त्यामुळे हळदीच्या विकासाला पुढे नेणाऱ्या उमेदवारासमोर या वेळी साखरेचे उत्तर असू शकेल अशी राजकीय गणिते मांडली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपनेही मतदारसंघावर दावा सांगितल्याने या मतदारसंघात अनेकजण भाजप बांधणीच्या कामात आहेत. पूर्वी या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपिवण्यात आली होती. आता मात्र ती जबाबदारी हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेल्या रामदास पाटील सुमठाणकर हे प्रभारी आहेत. हिंगोली मतदारसंघातील शिवसैनिक ठाकरे गटांबरोबर आणि नेते हेमंत पाटील वेगळीकडे असे चित्र आहे. शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरे गटाला उमेदवार शोधावा लागला असता. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत हिंगोली लोकसभेची जागाच राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागेच्या वाटाघाटीत यश मिळाले तर उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नते जयप्रकाश दांडेगावकर यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. पूर्णा साखर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी चांगला संपर्क असणारे दांडेगावकर यांचे विज्ञान शाखेत पदव्यूत्तर शिक्षण झालेले आहे. साखर महासंघाच्या सर्व स्तरावर त्यांनी या पूर्वी काम केलेले आहे. ऊस, कापूस या दोन्ही पिकांमधील संशोधने त्यावरील प्रक्रिया या क्षेत्रातील इत्थंभूत ज्ञान असणारे दांडेगावकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्यास कॉग्रेस नेत्यांचेही आक्षेप नसल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच पूर्णा साखर कारखान्यातील इर्थनॉल निर्मितीच्या कार्यक्रमास अशोक चव्हाण यांनीही आवर्जून हजेरी लावली.

हेही वाचा… कोल्हापूरातील महाडिक-पाटील संघर्ष आता राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात कॉग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते. २०१९ मध्ये राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यास नकार दिल्यानंतर सुभाष वानखेडे यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याची वेळ कॉग्रेसवर आली होती. मोठ्या फरकाने कॉग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याने जागा वाटपात राष्ट्रवादीकडून दावा बळकट केला जात आहे. ‘ ही जागा कॉग्रेसकडून काढून ती राष्ट्रवादीला मिळाल्यास या मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करायला आवडेल’ असे दांडेगावकर यांनी म्हटल्याने भाजपला त्यांच्या गृहपाठ नव्याने करावा लागण्याची शक्यता आहे.