विश्वविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला झाला. त्यांच्यावर चाकूने वार करून त्जयांना जखमी करण्यात आले आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी सलमान यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे.

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतात राजकीय शांतता पसरली आहे. सत्ताधारी भाजपा अजूनही या विषयावर मौन बाळगून आहे. राजीव गांधी सरकारने ऑक्टोबर १९९८ मध्ये रश्दी यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला भाजपाने विरोध केला होता आणि मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करत असल्याची टीका केली होती. नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रश्दी यांना फेब्रुवारी १९९९ मध्ये सॅटॅनिक व्हर्सेसच्या वादानंतर प्रथमच भारतात प्रवास करण्यासाठी व्हिसा मंजूर केला होता.

रश्दी यांच्यावरील हल्ल्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया अपेक्षित असताना याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. काही भाजपाचे नेते ऑफ द रेकॉर्ड म्हणाले की “परिस्थिती बदलली आहे. पक्षाने आता ठाम निर्णय घेतला आहे की आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या कोणत्याही घटनेवर भाष्य करणे टाळावे. विशेषत: रश्दी प्रकरणासारख्या संवेदनशील घटनेत शक्यतो कुणीही मत मांडू नये”.  त्यांच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा या त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आल्या होत्या. त्यांच्या विधानामुळे पक्षाचीसुद्धा अडचण झाली होती. याबाबत उमटलेल्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पक्षाने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मुद्द्यांवर भाष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपा सरकारच्या विरोधात असलेल्या मुद्द्यांवर भाष्य करू शकत नाही”. असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भाजपाच्या माजी मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी परदेशात त्यांच्या प्रतिमेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगत आहेत.त्यामुळे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेणारे आणि त्यांना किंवा त्यांच्या सरकारला अडचणीत आणेल असे काहीही करू नका असा स्पष्ट संदेश पक्षाच्या स्तरावर दिला गेला आहे. उदाहरणार्थ यूएस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर तैवानजवळील चिनी लष्करी कवायतींवर भाजपा आणि आरएसएसमधील अनेकजण भाष्य करण्यास उत्सुक होते.  परंतु भारत सरकारला अडचणीत आणणारी कृती होऊ नये यासाठी त्यांनी मौन बाळगले. 

अधिकृतपणे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्यावरील हल्ल्यावर आधीच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी आणि राज्यसभा खासदार अनिल बलूनी यांनीही या प्रकरणावर तेच सांगितले आहे.  गेल्या आठवड्यात बंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी अस्पष्ट प्रतिक्रिया दिली होती. हल्ल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की “मी देखील याबद्दल वाचले आहे. मला वाटते साहजिकच संपूर्ण जगाने याची नोंद घेतली आहे”. याव्यतिरीक्त ते या विषयीवर फारसे बोलले नाहीत.