Operation Sindoor India-Pakistan war : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत शेकडो दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली. भारतीय सशस्त्र दलाच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरून गेला होता. त्यांनी भारताच्या काही प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र भारतीय जवानांनी तो यशस्वीरित्या हाणून पाडला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना भारताविरोधात नेहमीच कुरघोड्या करणाऱ्या चीनची भूमिका नेमकी काय होती? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याबाबत भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (तारीख २६ मे) खुलासा केला आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणाव अमेरिकेने मिटवला?

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाला अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे पूर्णविराम मिळाला, अशा बातम्या काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर देशातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान काही नेत्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. १९७२ मध्ये इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला कसा धडा शिकवला होता, यावर प्रकाश टाकण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव खरंच अमेरिकेने मध्यस्थी करून मिटवला का? असा प्रश्न परराष्ट्रमंत्री परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा विचारण्यात आला.

नेमकं काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

“पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची अनेक तळे उद्ध्वस्त केली. तेव्हा पाकिस्तानने भारताच्या या हवाई हल्लाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने प्रतिहल्ला करून पाकिस्तानची प्रमुख हवाई तळं आणि हवाई संरक्षण प्रणालींवर प्रभावीपणे आघात करून ती निष्क्रिय केली, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

आणखी वाचा : Operation Sindoor : ‘त्या’ फोटोंकडे पाहून माझं रक्त खवळतं; पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

पुढे बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, “भारताच्या या कारवाईपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. बिथलेल्या पाकिस्तानने १० मे रोजी युद्धबंदीबाबत भारताकडे विनंती केली. यासंदर्भातील चर्चा दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून झाली होती. आपण भारतीय सशस्त्र दलाचे आभार मानले पाहिजेत. मी भारतीय लष्कराचे आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली.”

भारत-पाकिस्तान संघर्षात चीनची भूमिका काय होती?

भारत-पाकिस्तान या दोन देशांत संघर्ष सुरू असताना चीनची भूमिका नेमकी काय होती? असा प्रश्न माध्यमांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानी लष्करात असलेल्या चीनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा उल्लेख केला. “पाकिस्तानकडे असलेली अनेक शस्त्र प्रणाली ही चीनी बनावटीची आहे. भारताविरोधात नेहमीच कुरघोड्या करण्याची चीनची भूमिका राहिलेली आहे. त्यातच पाकिस्तान व चीनमध्ये खूप जवळीक आहे. त्यावरून तुम्ही स्वतः निष्कर्ष काढू शकता,” असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध होऊ शकतं का?

भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडील संघर्षाच्या काळात अण्वस्त्र संघर्षाची शक्यता होती का? असा प्रश्नही माध्यमांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, “आपण अण्वस्त्र संघर्षापासून खूप, खूप दूर होतो. या जगात काहीही घडलं की, थेट अण्वस्त्र युद्धाच्या चर्चा सुरू होतात. ही गोष्ट मला खूप त्रासदायक वाटते, कारण त्यामुळे दहशतवादासारख्या भयंकर गोष्टींना चालना मिळते,” असं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : भाजपा आमदाराचं मुस्लीम महिला IAS अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह विधान, गुन्हा दाखल; प्रकरण काय?

सत्य देशाला कळलं पाहिजे : राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व केंद्र सरकारवर सातत्याने टीका करीत असल्याचे दिसून येत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना नवीन प्रश्न विचारले आणि भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याची टीकाही केली. डच ब्रॉडकास्टर एनओएसला जयशंकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करीत राहुल गांधींनी ‘एक्स’वर लिहिले, “जेजे स्पष्ट करतील का : भारताला पाकिस्तानशी का जोडले गेले आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाकडून आपल्याला पाठिंबा का दिला गेला नाही? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘मध्यस्थी’ करण्यास कोणी सांगितले?” यावेळी राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्र्यांचा ‘जेजे’ असा उल्लेख केल्यामुळे भाजपाने या पोस्टवर तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाने राहुल गांधी यांच्या टीकांना अपरिपक्व आणि बेजबाबदार म्हणत ते ‘निशान-ए-पाकिस्तान’ असल्याचे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राची शिष्टमंडळं पाकिस्तानची पोलखोल करणार?

पाकिस्तान आणि शेजारील देशांतून निर्माण होणाऱ्या दहशतवादाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सात शिष्टमंडळं जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्यात आली आहेत. ही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांत जाऊन भारताची बाजू मांडत आहेत, दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती व गरज पटवून देत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे. अलीकडच्या काळात थरूर व काँग्रेसमध्ये तणाव असल्याची चर्चा रंगत होती. त्यावरून थरूर यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मोदी सरकारसाठी काम करत आहात का? यावर थरूर म्हणाले, “मी सरकारसाठी काम करत नाही, मी विरोधी पक्षातला नेता आहे. मी इथे माझ्या देशाची बाजू मांडायला आलो आहे”.