Sanjay Raut On Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देण्यात आली. दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या या कारवाईची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. मात्र, विरोधीपक्षातील नेते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या मोहिमेवरून सरकारला प्रश्न विचारले होते. आता शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (तारीख २७ मे) मुंबईत माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरलं आहे. पण देशहितासाठी विरोधकांनी त्यावर फार बोलणं टाळलं आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांची हत्या केल्यामुळे ऑपरेशन सिंदूरची गरज भासली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या घटनेला जबाबदार असून त्यांनी प्रायश्चित्त म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे.”
दहशतवादी आता कुठे लपून बसलेत?
“पहलगाममध्ये निष्पाप लोकांचे प्राण घेणारे दहशतवादी आता कुठे आहेत. ते गुजरातमध्ये किंवा दाहोदमध्ये लपले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाहीर सभा घेत आहेत; पण तुमच्या सरकारमुळेच महिलांचे सिंदूर नष्ट झाले आहे. केंद्र सरकारने या हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे”, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयावरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयामागे कोणतीही ठोस रणनीती दिसत नाही. भारत-पाकिस्तान मुद्द्याशी कोणताही संबंध नसलेल्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय? असा प्रश्नही खासदार राऊत यांनी उपस्थित केला.
“संजय राऊत पाकिस्तानची भाषा बोलतात”
खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर अपयशी म्हटल्याने राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. महायुतीचे नेते यावरून शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य करीत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून राऊतांवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींच्या दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेला संपूर्ण जग पाठिंबा देत आहे. ऑपरेशन सिंदूरला अपयशी म्हणणारे संजय राऊत कोण? ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे राऊत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बुडवून टाकतील,” असा घणाघात बावनकुळेंनी केला आहे.
“हा संपूर्ण देशाचा अपमान”
संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वक्तव्यावर महायुती सरकारमधील योगेश कदम यांनीही घणाघाती टीका केली. अशा प्रकारची विधाने ही ‘सडलेल्या मानसिकतेचे’ प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरला अपयशी म्हणायचं? आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाला माहीत आहे की, पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा आहे. भारताने त्या अड्ड्यावर हल्ला करण्याचे धाडस दाखवले. अशा ऑपरेशनवर बोट ठेवणे म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे. जर चांगले काही बोलता येत नसेल, तर गप्प बसावे.”
हेही वाचा : तेजप्रताप यादव यांच्यामुळे लालूंचा पक्ष चक्रव्यूहात? बिहारच्या निवडणुकीवर काय होणार परिणाम?
त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण
ऑपरेशन सिंदूर ‘अपयशी’ ठरल्याच्या वक्तव्यावरून टीकेचा सामना करावा लागल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, असं आम्ही कधीही म्हटलं नाही. ऑपरेशन सिंदूर ही आपल्या भारतीय सेनेच्या पराक्रमाची गाथा आहे. त्या प्रकरणात जे राजकारण केलं जात आहे, ते राजकारण फेल झालं आहे.” पुढे बोलताना राऊत म्हणाले, “मी सर्वपक्षीय बैठकीत असं म्हटलं होतं की ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत अपूर्ण राहील, जोपर्यंत पहलगाममध्ये आपल्या २६ बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्या सहा दहशतवाद्यांना पकडून दिल्लीमध्ये आणून त्यांची ओळख जाहीर केली जात नाही.”
“इंडिया गेटसमोर दहशतवाद्यांचा एन्काउंटर करा”
“मी असं म्हटलं होतं की, त्या सहा दहशतवाद्यांचे इंडिया गेटसमोर एन्काउंटर करा. तेव्हाच ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल. आता भारतीय जनता पक्षाला मिरची का लागावी? ऑपरेशन सिंदूरवर जे राजकारण केलं जातं आहे, त्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण होतोय की या ऑपरेशनमध्ये झालेल्या चुका लपवण्यासाठी भाजप सिंदूर यात्रा काढत आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की, यावरून राजकारण करू नका. संपूर्ण विरोधकांनी ही बाब मान्य केली आहे. आता राजकारण कोण करतंय?”, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.