ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताच्या झालेल्या नुकसानाबद्दल जनरल अनिल चौहान यांनी अलीकडेच माहिती दिली. त्यानंतर विरोधी पक्ष विशेष संसद अधिवेशन बोलावण्यासाठी पुन्हा एकदा आग्रह धरला जात असताना सध्या असे अधिवेशन बोलावण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. “सध्या तरी अशी कोणतीही योजना नाही. विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या महिन्यात ते होण्याची शक्यताही नाही”, असे एका वरिष्ठ सूत्राने सोमवारी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे, असेही सरकारी अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जून रोजी सरकार विशेष अधिवेशन बोलावू शकते, अशीही अटकळ होती. मात्र, आता तीदेखील शक्यता नाही. शनिवारी संरक्षण दलप्रमुख जनरल चौहान यांनी दोन मुलाखतींमध्ये केलेल्या टिप्पण्यांमुळे विरोधी पक्षांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर विशेष सत्र बोलावण्याची मागणी नव्याने सुरू केली. मे महिन्यात झालेल्या संघर्षादरम्यान भारताला सुरुवातीला नुकसान सहन करावे लागले आणि त्यानंतर पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळविण्यासाठी रणनीती बदलावी लागली, असे त्यांनी सांगितले. कारवाईदरम्यान लढाऊ विमाने पाडल्याची ही पहिली अधिकृत कबुली होती.

काँग्रेसने विशेष सत्रासाठी विरोधी पक्षांकडून स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. त्यांनी सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’पासून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन संरक्षण तयारी आणि रणनीती यांवर चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसव्यतिरिक्त तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राजद, डावे पक्ष, समाजवादी पक्ष (सपा) व इंडियन युनियन मुस्लिम लीग यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या मुद्द्यावर एकमत निर्माण करण्यासाठी इतर विरोधी नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे समजते.

सोमवारी राजदचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानविरुद्ध अलीकडच्या सीमापार कारवाया, त्याचे परिणाम व पुढील मार्ग यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याची विनंती केली. समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, हे अधिवेशन विलंब न करता, बोलावले गेले पाहिजे; जेणेकरून सरकार भारताचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण देशासमोर मांडू शकेल.

“सिंगापूरमध्ये संरक्षण दलप्रमुखांनी (सीडीएस) दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. संसदेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावले, तरच हे करता येईल”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी एक्सवर पोस्ट केली. सरकारी सूत्रांनी सांगितले, “संरक्षण दलप्रमुखांचे भाष्य नियमाबाहेरचे नाही”. त्याशिवाय एअर ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनीही ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत तसेच संकेत दिले होते. संरक्षण दलप्रमुखांच्या विधानामुळे भारताला झालेल्या नुकसानीबद्दलच्या अटकळींना पूर्णविराम मिळेल, असेही एका सूत्राने सांगितले.

भाजपा नेत्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त अधिवेशन बोलावण्याच्या काही सूचना असल्या तरी पक्षाने या मुद्द्यावर अद्याप चर्चा केलेली नाही. दरम्यान, त्यांनी असेही सांगितले की, पक्ष या मुद्द्यावर काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी देशभरात कार्यक्रम आयोजित करील.

मंत्रिमंडळाची बैठक होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित असणार आहेत, असे सरकारच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. या बैठकीत मोदी ऑपरेशन सिंदूर आणि सरकारच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच मंत्र्‍यांनी या संदर्भातील माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशीही अपेक्षा असेल.
२२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच ही अशी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. तेव्हा या बैठकीत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी काय रणनीती आखली जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे, सरकार इतक्या दिवसांनंतरही विशेष अधिवेशनासाठी तयार नसल्याने विरोधक आता कोमता नवा मुद्दा हाती घेतली हेही महत्त्वाचं आहे.