PM Modi on Panchayati Raj Day : राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील रेवा येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी गतकाळातील काँग्रेसप्रणीत सरकारवर घणाघाती टीका केली. “मागच्या काळातील सरकारने गावांकडे दुर्लक्ष केले. कारण गाव त्यांच्यासाठी मतपेटी नव्हते. अनेक राजकीय पक्षांनी गावांमध्ये फूट पाडून आपले दुकान चालविले. स्वातंत्र्याच्या शेकडो वर्षे आधीपासून आपल्या देशात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात होती. मात्र १९४७ नंतर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले. महात्मा गांधी म्हणाले होते की, भारताचा आत्मा गावात राहतो. पण काँग्रेसने गांधीजींच्या शब्दांकडेही दुर्लक्ष केले,” अशा शब्दांत मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजपा सरकारने पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठा निधी देऊ केला आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल तर गावांची सामाजिक-आर्थिक व्यवस्था विकसित होणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी भारताच्या ग्रामीण भागातील पंचायत राज व्यवस्था विकसित करायला हवी. आमचे सरकार देशातील पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने लक्ष देत आहे. केंद्र सरकार ज्या काही योजना तयार करत आहेत, त्या योजना ग्रामीण भारतातील माणसाचे जगणे सुसह्य करणाऱ्या आहेत. आपले पंचायत राज या योजना यशस्वी करण्यासाठी मैदानात उतरून समर्पण वृत्तीने काम करत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर काँग्रेसकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख आणि खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यासाठी १९९३ साली ७३ वी घटनादुरुस्ती केली. “आज भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. ३० वर्षांपूर्वी ७३ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. यामुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे यात महत्त्वपूर्ण योगदान होते,” असेही जयराम रमेश म्हणाले.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही याबद्दल भाष्य करण्यात आले. “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय पंचायत राजची सुरुवात करून गांधीजी यांचे ग्राम स्वराजचे स्वप्न सत्यात उतरवले. गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले. महिलांना पंचायत राज व्यवस्थेत एक तृतीयांश आरक्षण देऊन राजीव गांधी यांनी महिलांचेही सबलीकरण केले. पंचायत राज हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. आज पंचायती राज दिवसाच्या निमित्ताने आपण लोकशाहीचा हा पाया भक्कम होण्यासाठी प्रार्थना करू या,” अशी भूमिका काँग्रेसने ट्विटरवर मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसने पुढे म्हटले की, राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे पंचायत राज आणि गंगा विकास धोरणांमुळे गावांच्या विकासाला एक नवी चालना मिळाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले, “पंचायतीचे पंच, मुखिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व सदस्यांना राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या शुभेच्छा. आपण सर्व एकत्र मिळून महात्मा गांधी यांचे ग्राम स्वराज्याचे ध्येय आणि राजीव गांधी यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालून पंचायत राज व्यवस्था आणखी बळकट करू.”