पंढरपूरच्या वारीबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक स्थळांचा वापर यांवरून वाद वाढत चालला आहे. आझमी यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख करीत पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होत असल्याचे विधान केले होते. पंढरपूर वारीवरील आझमींच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. नेमका हा वाद काय आहे? अबू आझमी नक्की काय म्हणाले? वारी म्हणजे नक्की काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

वारी म्हणजे काय?

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पवित्र यात्रा आहे. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी पायी चालत ही यात्रा करतात. आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये विठोबाच्या दर्शनासाठी भाविक वारी करतात. ही यात्रा आषाढी एकादशीला संपते. वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वारकरी म्हटले जाते. या वर्षी वारी १९ जून रोजी सुरू झाली आणि ६ जुलै रोजी विठोबाच्या अंतिम दर्शनाने ती संपेल. ही परंपरा ७०० वर्षांहून अधिक काळापासून चालत आली आहे. या परंपरेची मुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव व संत एकनाथ यांसारख्या संतांशी जोडलेली आहेत. अनेकदा याला ‘महाराष्ट्राचा कुंभमेळा’ही म्हटले जाते.

आझमी यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख करीत पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होत असल्याचे विधान केले होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून, ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचे एक प्रतीक आहे. सर्व जाती-धर्मांचे पुरुष आणि स्त्रिया भक्तिभावाने या वारीनिमित्त एकत्र येतात. वारकरी भजन करतात, कीर्तन करतात आणि सजवलेल्या पालख्यांमधून संतांच्या पादुका (पवित्र पाऊलखुणा) घेऊन जातात. वारकरी तुळशीच्या माळा घालतात, गोपीचंदनाचा टिळा लावतात आणि जवळजवळ २५० किलोमीटर पायी चालतात. यात्रेतील रिंगण सोहळा हे प्रमुख आकर्षण असतो. या रिंगणात एक पवित्र घोडा वर्तुळात धावतो आणि ते दृश्य पाहून भक्त उत्साहाने जल्लोष करतात.

वारी काळानुसार विकसित झाली आहे. गेल्या काही वर्षांत, त्यात स्वच्छता अभियान आणि सायकल वारी (पर्यावरणीय उपक्रम) यांसारखे आधुनिक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. ही वारी स्वच्छतेत पार पडावी, हा यामागील उद्देश आहे. जाती, वर्ग आणि धार्मिक विभाजनांनी विखुरलेल्या समाजात, वारी एकता, परस्पर आदर व समता यांचा संदेश देते. वारीत धर्म, जाती यांच्या आधारावर कोणताही भेदभाव नसतो, महिला समान अभिमान बाळगून चालतात. मुख्य म्हणजे वारीत मासिक पाळी पाळली जात नाही.

अबू आझमी यांच्या विधानाने वाद

महाराष्ट्रात ही प्राचीन परंपरा साजरी केली जात आहे. पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यातच आता आझमी यांनी केलेल्या व्यक्तव्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा तापला आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मुंबईच्या मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांनी अलीकडे पत्रकारांशी संवाद साधताना हे वादग्रस्त विधान केले. त्यांनी मोठ्या पदयात्रेमुळे अनेक जिल्ह्यांमधील वाहतूक ठप्प झाल्याचे म्हटले. “मी पुण्याहून येत होतो. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीसाठी रस्ते बंद असल्याने मला लवकर निघण्यास सांगण्यात आले. पण, मुस्लिमांनी कधीही तक्रार केली नाही. मुस्लीम आणि हिंदू भावांसारखे खांद्याला खांदा लावून चालतात; पण त्यांच्यात जाणूनबुजून फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो,” असे आमदार आझमी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

आझमींच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. वारीविषयी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सार्वजनिक नमाजांवरील वादग्रस्त भूमिकेचा उल्लेख केल्याने हा विषय आणखीन तापला. ते म्हणाले, “नमाजाच्या वेळी मशिदी कधी कधी भरलेल्या असतात. त्यामुळे लोक रस्त्यांवर नमाज अदा करतात, ज्याला पाच ते १० मिनिटे लागतात. परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, अशा कृत्यांमध्ये सहभागी असणारे त्यांचे पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स गमावतील.” मुस्लिमांनी कधीही विचारले नाही की, रस्त्यावर सण का साजरे केले जातात, असेही ते म्हणाले.

आझमी यांच्या विधानांचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला. ते म्हणाले, “आझमी प्रसिद्धी मिळविण्यासाठी वादग्रस्त विधाने करण्यासाठी ओळखले जातात. मी याला काहीही महत्त्व देत नाही.” एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य असलेले लोकसभा खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “अबू आझमींसारख्या नेत्यांमुळे मुस्लीम समुदायाविरोधात नाराजी आहे. पंढरपूरची वारी भारतात इस्लामच्या आगमनापेक्षा जुनी आहे. मुस्लीमही वारीत सहभागी होतात.” म्हस्के पुढे म्हणाले की, भाविकांनी केलेली वारी ही एक अतिशय शिस्तबद्ध प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वारकरी रस्त्याच्या कडेला चालतात. भाजपासह इतर पक्षांच्या नेत्यांनीही अबू आझमी यांच्या विधानावर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आझमींनी मागितली माफी

सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना लिहिले, “सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझे वक्तव्य तोडून-मोडून सादर करण्यात आले आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो.”