Hardeep Singh Puri on Modi Government : केंद्रात पूर्ण बहुमताने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणाऱ्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सोमवारी वर्षपूर्ती केली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. त्यानंतर २०१९ मध्येही भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवत दुसऱ्यांदा बहुमताचा आकडा गाठला. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला. मात्र, इंडिया आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे सत्ताधाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. २०१४ नंतर पहिल्यांदाच भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही.
इंडिया आघाडीने दिलेला संविधान बचावाचा नारा, विरोधकांनी निवडणुकीत दिलेल्या आक्रमक प्रचाराचा नारा यामुळे २०१९ च्या तुलनेत (३०३ जागा) २०२४ मध्ये भाजपाचे केवळ २४० खासदारच निवडून आले. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांचे समर्थन घेऊन सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. दरम्यान, केंद्रात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होऊन ११ वर्षांचा कालावधी लोटला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘The Indian Express’ या वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्राच्या प्रमुख यशस्वी योजना, दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबविलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम, तसेच २०२७ मधील पंजाब विधानसभा निवडणुका यांसारख्या विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या तीन प्रमुख यशस्वी बाबी कोणत्या? असं प्रश्न मंत्री पुरी यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या कामगिरी कोणत्या?
- विकासाच्या लाभांचा आणि वस्तू व सेवांच्या वितरणाचा देशभरात विस्तार झाला आहे.
- शासकीय योजना आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.
- वस्तू व सेवा सर्वत्र समान पद्धतीने वितरित होत आहेत. हे केंद्र सरकारचं सर्वात मोठं यश आहे, असं मंत्री पुरी म्हणाले.
- महिलाकेंद्रित विकासाच्या संकल्पनेतून महिलांनी नेतृत्व करणाऱ्या विकासाकडे झालेली सकारात्मक वाटचाल.
- जेव्हा महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी स्थान दिलं जातं, तेव्हा तो विकास अधिक शाश्वत आणि वेगवान ठरतो, असं मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.
- आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अभिमान बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण ते सहजपणे समजले जात नाही, असं मत मंत्री पुरी यांनी व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा : Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने; अशांततेला नेमकं जबाबदार कोण?
मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, “वाजपेयींनी संयुक्त राष्ट्र महासभेत हिंदीत भाषण केलं होतं, तोपर्यंत इंग्रजी न येणारे अनेक नेते तिथे तुटक इंग्रजीत आपले भाषण देत असत. मात्र, याची गरजच काय? स्वतःची भाषा बोलणं गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाच अधिकृत भाषा आहेत आणि इंग्रजी अनिवार्य नाही. मी स्वतः इंग्रजीत शिक्षण घेतलेलं आहे आणि मला वाटते की इंग्रजी सुरू राहिली पाहिजे. मात्र, लोकांना त्यांच्या मातृभाषेत आणि प्रादेशिक माध्यमांद्वारे शिक्षण देण्यातही अभिमान असायला हवा,” असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धविरामावरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी ‘नरेंदर सरेंडर’ असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रत्युत्तर दिलं. “ऑपरेशन सिंदूर, समाप्त झाले नसून ते अद्यापही सुरूच आहे. त्याच्या व्यवस्थापनात परिपक्वतेचा ठसा दिसतो,” असे पुरी यांनी म्हटलं आहे. युद्धविराम करायचा का नाही याचा संपूर्ण निर्णय लष्करप्रमुखांकडे होता, केंद्र सरकारची त्यात कोणतीही भूमिका नव्हती, असं स्पष्ट करताना घरबसल्या टीका करणाऱ्या लोकांकडे आम्ही जास्त लक्ष देत नाहीत, असं पुरी यांनी स्पष्ट केलं.
“भारताची अर्थव्यवस्था प्रगती पथावर”
“जगभरातील लोक भारतातील परिपक्व नेतृत्वाचे कौतुक करीत आहेत. आपल्या लष्कराने २२ मिनिटांत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यांनी भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण आपल्या जवानांनी तोही हाणून पाडला,” असं पुरी यांनी म्हटलं आहे. आज भारत ४.३ ट्रिलियन डॉलर्सचा अर्थव्यवस्थेसह प्रगती करीत आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राला संपूर्ण जगात मागणी आहे आणि त्याचा एक भाग भारतात तयार होतो आहे,” असंही पुरी म्हणाले.
हेही वाचा : लोकसभेतील अपयशानंतर भाजपाने कसं केलं पुनरागमन?
“देशातील गरीबीचं प्रमाण घटलं”
देश सध्या ११ वर्षांच्या उत्कृष्ट शासनामुळे उत्सवाच्या वातावरणात आहे. “आर्थिक व कल्याणकारी योजना आणि बहुआयामी गरीबीतून लोकांची संख्या कमी झाल्यामुळे अभिमान वाटतो. गरीबीचे प्रमाण २४ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. बेरोजगारीही कमी झाली आहे; अजूनही काम करायचे आहे आणि विकासदर ८ टक्के असावा, अशी अपेक्षा आहे,” असे पुरी यांनी सांगितले.
“आम्ही फक्त विकासकामांविषयी बोलतो”
“केंद्रात सलग ११ वर्षांपासून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असल्यामुळे देशाचा विकास झपाट्याने झाला आहे. देशाचा विकास दर ८% राहील अशी अपेक्षा आहे,” असेही पुरी यांनी यावेळी सांगितले. आपण फक्त विकासकामांची चर्चा करावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी करीत असलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करायचे, असेही ते म्हणाले.