मुंबई : मराठा- ओबीसी समाजातील वादाने राज्यातील सामाजिक घडी विस्कटल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या वतीने किल्ला लढविणारे छगन भुजबळ यांची प्रतिमा मराठा समाजात खलनायक अशी झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची नाराजी परवडणारी नसल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला आता छगन भुजबळ हे नकोसे झाल्याची चर्चा आहे.

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. भुजबळ हे पुन्हा शरद पवारांच्या पक्षात परतणार अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. पण शरद पवार भुजबळांना स्वीकारतील का, हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीतील बंडात छगन भुजबळ यांनी अजित पवारांना साथ दिली. त्याबदल्यात त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटल्यापासून भुजबळ काहीसे एकाकी पडल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भिडण्याचे धाडस भुजबळांनी केले. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षणाचे वाटेकरी होऊ न देण्यास भुजबळ जबाबदार असल्याचे चित्र जरांगे यांनी उभे केले. त्यातून मराठा समाजात भुजबळांची प्रतिमा खराब झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणारे खलनायक म्हणून त्यांची प्रतिमा रंगविण्यात आली.

हे ही वाचा… “केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?

भुजबळ हे सध्या अजित पवार गटात असले तरी त्या पक्षातही ते फारसे समाधानी नाहीत. ते ओबीसी समाजाचा पुरस्कार करीत असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काही प्रमाणात फटका बसू लागला आहे. कारण राष्ट्रवादीचा पाया हा मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात अधिक आहे. या भागात मराठा समाजाची नाराजी अजित पवार गटाला परवडणारी नाही.

भुजबळ पवार भेट म्हणजे प्रगल्भ राजकीय संस्कृती दर्शन आव्हाड

शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, हे कुणालाही सांगता येणार नाही आणि हे दोन्ही नेते कुणाला सांगणारही नाहीत. पण या दोन्ही नेत्यांच्या भेटीतून राज्यातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा, असे सांगत आम्ही आता लवकरच सत्तेत येऊ आणि त्यानंतर आरक्षण देऊ, असा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा… राम मंदिर आणि मोदींवर भाजपाचा अतिविश्वास होता का? केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल काय म्हणाल्या?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार गटाला भीती

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात केवळ ओबीसी मतदारांमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. यामुळेच भुजबळांची इच्छा असली तरी कोणताही राजकीय पक्ष त्यांना स्वीकारण्यास तयार होणार नाही. भुजबळांच्या ओबीसी राजकारणामुळे मराठा समाज हा शरद पवारांच्या पक्षाकडे आकर्षित होण्याची भीती अजित पवार गटाच्या नेत्यांना वाटते. मराठा-ओबीसी वादामुळे भुजबळांना निवडणूक जड जाईल, अशी चिन्हे आहेत. यामुळेच राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण अजित पवारांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने भुजबळांचा नाइलाज झाला.