लक्ष्मण राऊत

जालना : राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना येथे आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसकडे निरोप पाठविला असून आता काय करायचे,हा त्यांचा प्रश्न आहे.

हेही वाचा… भुमरे यांच्यामुळे औरंगाबादच्या वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवर ग्रामीण पगडा

शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाचे पारडे जड आहे याचा निर्णय निवडणुकांच्या निकालातच लागेल. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकमेव कार्यक्रम देशाची घटना बदलण्याचा आहे. शिवसेना आणि आमच्यात मतभेद आहेत. परंतु ते घटना बदलावी, असे म्हणत नाहीत. काँग्रेस पक्ष घटनेचाच एक भाग असल्याचे आपण मानतो.

हेही वाचा… निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी बावनकुळे-शेलार यांची शहांशी चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला १०० दिवस झाले असून त्याबद्दल काय वाटते, असा प्रश्न विचारला असता आंबेडकर म्हणाले, अजून अशी जादूची कांडी निघाली नाही की ज्यामुळे शंभर दिवसांत बदल घडू शकेल. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कुणाला धनुष्यबाण चिन्ह द्यायचे याचा निर्णय तत्काळ होईल असे वाटत नाही. या संदर्भात निर्णय घेणाऱ्यांच्या समोर सर्व तथ्ये आल्याशिवाय ते निर्णय घेणार नाहीत. अंधेरी येथील विधानसभेची पोटनिवडणूक वंचित बहुजन आघाडी लढविणार किंवा नाही याचा निर्णय आमची राज्य समिती घेईल, असेही आंबेडकर म्हणाले.