प्रबोध देशपांडे

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी काळातील निवडणुकांसाठी तयारीवर जोर दिला असून, वंचित आघाडीने आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली. पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना ॲड. आंबेडकरांनी दिल्या आहेत. अकोला जिल्ह्यात ओबीसी परिषद घेऊन त्यांनी विविध समाजाची मोट बांधण्यास सुरुवात केली. अकोला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित आघाडीने ग्रामीण जनाधार मजबूत करण्यासाठी शेत रस्त्यांच्या योजनेची देखील घोषणा केली. पोषक वातावरण निर्मिती केली जात आहे.

राज्यात घडणाऱ्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्ष दक्ष झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यानंतर २०२४ या सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षासाठी राजकीय पक्ष कामाला लागले. यामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी घेतली. एप्रिल महिन्याच्या शेवटी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे भाकीत सुद्धा ॲड. आंबेडकर यांनी केले. सातत्याने धक्के बसणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करत वंचितने त्यांच्यासोबत युती केली. २०१९ च्या निवडणुकीपासून वंचितने विविध निवडणुकांमध्ये दखल पात्र मते घेऊन राज्यात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. वंचितने आता आगामी निवडणुकांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा… सोनिया-राहुल यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीवर खल

हेही वाचा… सांगलीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अशीही मशागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा गड म्हणून ओळखला जातो. अकोला जिल्हा परिषद वंचित आघाडीचे सत्ता केंद्र असून दोन दशकाहून अधिक काळापासून सत्ता कायम आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय लोकसभेची जागा जिंकता आलेली नाही. आता उद्धव ठाकरेंसोबत युती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्या दृष्टीने देखील त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितला त्यांच्याकडे असलेली एकमेव बाळापूरची जागा देखील गमवावी लागली. एक-दोन ठिकणी वंचितचा निसटता पराभव झाला. भाजपसोबतच्या युतीमुळे शिवसेनेने बाळापूरमधून विजय मिळवला. आता उद्धव ठाकरेंसोबत वंचितची युती असल्याने बाळापूरची जागा कळीचा मुद्दा ठरू शकतो. अकोला जिल्हा परिषदेत २०१९ सत्ता कायम राखण्यात वंचितला यश आले असले तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. २०२४ च्या शेवटी जिल्हा परिषदेची देखील निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामीण भागातील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान वंचितपुढे असेल. त्यामुळे संघटन बांधणी मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचे वंचितचे प्रयत्न आहेत. त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: जिल्ह्यात लक्ष घातले. जिल्ह्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आता ओबीसी परिषद घेऊन त्यांनी विविध समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतरस्त्यांची मोठी समस्या आहे. बळीराजाच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न लक्षात घेत अकोला जिल्हा परिषदेची शेत रस्त्यांची महत्त्वाकांक्षी योजना ॲड. आंबेडकरांनी जाहीर केली. मे महिन्यापर्यंत शेत रस्त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असून निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.