CM Bhagwant Mann on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे परदेशात पाठवली आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपा ‘घर घर सिंदूर’ हे अभियान राबविणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून भाजपाने आम आदमी पार्टीवर टीकेची तोफ डागली आहे. ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्या भगवंत मान यांनी तातडीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे नेते करीत आहेत.

नेमके काय म्हणाले भगवंत मान?

पंजाबच्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे आम आदमी पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज मंगळवारी लुधियानामध्ये आले होते. यावेळी त्यांनी जाहीर पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या ‘घर घर सिंदूर’ या कथित मोहिमेवर विखारी टीका केली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी सिंदूर वाटल्याच्या वृत्तांवर मुख्यमंत्री म्हणाले, “तुमच्या घरातही सिंदूर आला तर तो तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लावणार का? ‘एक राष्ट्र, एक पती’ ही भाजपाची नवीन योजना आहे का?”

आणखी वाचा : माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष फुटणार? के. कविता यांनी नेमका काय इशारा दिला?

भगवंत मान यांच्याविरोधात भाजपा आक्रमक

  • मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ वर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
  • पंजाबमधील भाजपाचे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालीवाल यांनी मान यांचे विधान असंवेदनशील आणि लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
  • बालीवाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून मुख्यमंत्री मान यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर केला.
  • बालीवाल म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा होता. या मोहिमेचा सिंदूर वाटपाशी कोणताही संबंध नाही. ही कारवाई दहशतवाद्यांचा खात्मा व भारतीय नागरिकांच्या सुरक्षितेसंदर्भात होती.”
  • भगवंत मान यांनी भारतीय लष्कराची थट्टा उडवून शहीद जवानांच्या पत्नींचा अपमान केला आहे. त्यांनी तातडीने देशाची माफी मागून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा भाजपाकडून मोठं आंदोलन केलं जाईल, असंही बालीवाल म्हणाले.
bhagwant mann on operation sindoor (PTI Photo)
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (फोटो सौजन्य पीटीआय)

“भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही भगवंत मान यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. मुख्यमंत्री मान यांनी केलेलं वक्तव्य हे भारतीय सशस्त्र दलांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधक वारंवार त्यांची भारतविरोधी मानसिकता उघड करीत आहेत. मुख्यमंत्री मान यांनी त्यांच्या विधानाबद्दल संपूर्ण देशाची माफी मागावी आणि ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदीप भंडारी यांनी केली आहे. पंजाबमधील भाजपाच्या इतर नेत्यांनीही मुख्यमंत्री मान यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपा विरुद्ध आम आदमी पार्टी असा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहेत.

हेही वाचा : चीनने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले तर काय? पाकिस्तानच्या धमकीवर काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

“पंतप्रधान मोदी सिंदूर विकायला निघाले”

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याव्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपाच्या ‘घर घर सिंदूर’ या कथित अभियानावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “भारताच्या शूर जवानांनी पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेण्याचे भाजपाचे प्रयत्न आहे. त्यांनी याचा राजकीय फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे परदेशात जाऊन भारताची बाजू मांडत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये येऊन ऑपरेशन सिंदूरचा राजकीय प्रचार सुरू केला आहे.” पंतप्रधानांवर टीका करताना ममता म्हणाल्या, “पूर्वी ते स्वतःला चहा विक्रेता म्हणायचे, नंतर त्यांनी चौकीदार म्हणून घेतलं. आता ते देशभरात जाऊन सिंदूर विकण्याचं काम करीत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑपरेशन सिंदूर’ नेमकं काय होतं?

जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतानं या हल्ल्याचा सूड म्हणून ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात आले. भारतीय लष्कराने राबविलेल्या या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं. यानंतर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्यदलाने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.