तुकाराम झाडे

नांदेड, हिंगोली : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील चमूने नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे दणक्यात स्वागत केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात एकदाही न फिरकणाऱ्या लातूरकरांची गर्दी दिसू लागली आहे. नांदेड जिल्ह्यात यात्रे दरम्यान काँग्रेसचे नेते अमित देशमुख, धीरज देशमुख किंवा परिवारातील सदस्य सहभागी झाले नाहीत. अमित देशमुख यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील तयारीची जबाबदारी टाकण्यात आली होती. नांदेडमधील सारे काही हिंगोलीतही दिसेल किंबहुना जाहिरात फलकही सारखे असावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले पण नांदेडकरांनी त्यास विरोध केल्याचे माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यापासून ते यात्रेतील सहभागी व्यक्तींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात जातीने लक्ष घालत आहेत.

हेही वाचा… देश-विदेशातून भारत जोडोसाठी यात्री दाखल

हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रे दरम्यान राज्यातील अनेक लेखकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे नांदेडमधील यात्रेचे तेज आता कमी होईल पण यात्रेतील वैचारिक चर्चेला हिंगोलीत सुरुवात होईल असे मानले जात आहे. यात्रेत दुपारी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही चालणार आहेत. राज्यात नांदेड येथे भारत यात्रा पहिल्यांदा येणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह होता. आता तो हिंगोली जिल्ह्यातही तेवढ्याच प्रमाणात असावा व ते चित्र सर्वसामांन्यापर्यंत जावे यासाठी काँग्रेस नेते मेहनत करीत आहेत. यात्रा येण्यापूर्वीपासून सुविधांच्या तयारीसाठी समन्वयक बाळासाहेब थाेरात यांनी हिंगोली जिल्ह्यातील सातव व गोरेगावकर या नेत्यांमध्ये मनोमीलन घडवून आाणले. शिवाय हिंगोलीची जबाबदारी अमित देशमुख यांच्या खांद्यावर दिली. त्यामुळे हिंगोलीमध्ये लातूरकरांची संख्या अधिक दिसेल असे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात यात्रे दरम्यान सर्व मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये शिवराज पाटील चाकुरकर यांचाही सहभाग होता. मात्र, अमित देशमुख हे थेट हिंगोली जिल्ह्यातच दिसतील असे सांगण्यात आले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील १५ हजार कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्यात यात्रेत चालणार आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा… इंदिरा गांधींनी आम्हा भटक्यांना नाव, गाव दिलं….आम्ही त्यांच्या नातवाला पाठिंबा द्यायला आलो…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यात्रे दरम्यान राज्यातील लेखक व साहित्यिकही सहभागी होणार असून समता, आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, विज्ञान- तंत्रज्ञान याचा प्रचार व्हावा व लोकशाही मूल्य टिकवून ठेवण्यासाठी या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी साहित्यिक मंडळीही या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, श्रीकांत देशमुख आदी या साहित्यिकांचे एकत्रीकरण करत असून यामध्ये अनेक मान्यवर लेखक व कवींचाही सहभाग असणार आहेत.