अलिबाग : माजी आमदार सुभाष पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे जे एम म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाची रायगडमध्ये वाताहत होत असल्याचे चित्र निर्माण झाले असतांनाच, अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे पक्षमेळावा घेऊन शेकापने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नेते गेले तरी कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला.
विधानसभा निवडणूकीनंतर शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली होती. अलिबाग मधून माजी आमदार सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांनी पक्षाची साथ सोडली होती. तर उरण मधून निवडणूक लढवणारे प्रितम म्हात्रे, जे एम म्हात्रे यांनीही साथ सोडली होती. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पक्ष कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी शेकापने अलिबाग येथील पेझारी येथे मेळावा घेतला. पक्ष सोडून गेलेल्या माजी आमदार सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांचे वास्तव्य असलेल्या पेझारी येथेच मेळावा घेऊन पक्ष संघटना आणि कार्यकर्ते अजूनही आपल्याच सोबत असल्याचे दाखवून दिले.
गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या पक्षपदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या. पक्षाची होणारी पडझड थोपवण्यासाठी यावेळी व्यापक पावले उचलण्यात आल्याचे दिसून आले. तब्बल तीन हजार हून अधिक कार्यकर्त्यांना पक्षातील पदांवर तसेच विवीध संघटना, आघाड्यावर सामावून घेण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नियुक्त्यावर भर दिला गेला.
स्वातंत्रपूर्व पेझारीतून नारायण नागू पाटील यांनी खोती विरोधात लढ्याची सुरवात केली होती. शेतकऱ्यांचा पहिला संप याच परिसरात झाला होता. ज्यामुळे कुळ कायदा अस्तित्वात आला. याची जाणीव नवीन पिढीला व्हावी यासाठी पेझारी येथे या मेळाव्याचे आयोजन केल्याचे यावेळी सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र मेळाव्याचा मुख्य उद्देश हा भाजपला आपली ताकद दाखवून देण्याचा होता.
माजी आमदार सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्ष संघटनेला काहीच फरक पडला नाही हे देखावून देण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. सुरवातीला पेझारी येथील शाळेच्या मैदानावर हा मेळावा होणार होता. मात्र त्यास विरोध झाल्याने पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विवीध भागातून कार्यकर्ते पेझारीत आणून जयंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन केले. आणि पक्षसंघटनेवर अजूनही आपली घट्ट पकड असल्याचे दाखवून दिले.
जयंत पाटील यांची भाजपवर टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली राज्यघटना आणि कायदे बदण्याचे काम भाजपच्या वतीने केले जात असल्याचा आरोप यावेळी शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांनी केला. सरकार जनसुरक्षा कायदा आणून सर्वसामान्यांचा आंदोलन करण्याचा अधिकारच काढून घेणार असून, आंदोलकांना नक्षलवादी ठकवून तीन वर्षापर्यंत तुरुंगात टाकले जाण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने शेतकऱ्यांची पिक विमा योजना बंद केली आहे आणि लाडकी बहिणही आता लाडकी राहीलेली नाही अशी टीका करत त्यांनी भाजपच्या धोरणांवर निशाणा साधला.