सुजित तांबडे

पुणे : पुुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) फुटीच्या उंबरठ्यावर असताना फूट टाळण्यासाठी आणि पक्षाची पडझड रोखण्यासाठी मनसेची समन्वय समिती सक्रिय झाली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुका हे लक्ष्य ठेऊन प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ’बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाशी जवळीक करून बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे धनुष्य या समन्वय समितीने उचलले आहे. ही समिती बंडखोरांचे बंड शमविण्यात यशस्वी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

पुण्यातील मनसेतील अंतर्गत कलह वाढल्याने काही पदाधिकारी हे बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी सक्षम पर्यायाच्या शोधात असलेले पदाधिकारी हे शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या संपर्कात आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता‘ने दिल्यानंतर मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. पक्षाची पडझड रोखण्यासाठी समन्वय समितीही सक्रीय झाली आहे. या समितीमध्ये पक्षाची ज्येष्ठ नेतेमंडळी असून, त्यांच्याकडून बंडखोरी शमविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

‘पक्षात फूट पडणार नाही’

याबाबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस म्हणाले, ‘पक्षामध्ये फूट पडणार नाही. पक्षाची समन्वय समिती संबंधितांशी संवाद साधणार आहे. सद्यपरिस्थितीत पक्षबांधणी मजबूत आहे. आगामी काळात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेची अंमलबजावणी केली जाणार आहे’

हेही वाचा : सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज ‘बाळासाहेबांची शिवसेना’च्या वाटेवर !

‘एकला चालो रे’

मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्याने नाराज असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे पक्षातील फुटीबाबत म्हणाले, ‘मी पक्षाबरोबरच आहे. यापूर्वी मी अस्वस्थ होतो. आता ही माझे काम करत आहे. मात्र, शहरातील कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये नसतो. शहराचे नेते बाबू वागस्कर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना शहरातील कोणत्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, हे माहीत असेंल. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे माझे काम सुरू आहे. सुरुवातीपासून पक्षाची ‘एकला चालो रे’ ही भूमिका होती. आगामी महापालिका निवडणुकीतही हीच भूमिका असेल.

हेही वाचा : सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश न केल्यामुळेच अध्यक्षपदाची ‘विकेट’; तृणमूल, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाची टीका

फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या पुण्यातील मनसेबाबत शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी भूमिका व्यक्त करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, पक्षप्रमुखांकडून नियोजित दौरे रद्द होणे, स्थानिक नेत्यांकडून आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नागरिकांच्या प्रश्नांमध्ये घेण्यात येणारी भूमिका आणि दुभंगलेल्या शिवसेनेमुळे निर्माण झालेल्या संधीचा लाभ घेण्याऐवजी समाजमाध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास कार्यकर्त्यांना घातलेली बंदी या परिस्थितीत पुण्यातील मनसे ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. या परिस्थितीत समन्वय समिती ही पदाधिकाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यात यशस्वी होते का, याबाबत उत्सुकता असणार आहे.