संघाच्या विचारधारेवर चालणारा पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची (भाजपा) ओळख आहे. गेल्या अनेक दशकांपासून भाजपाला संघाची साथ लाभली आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पुढे आल्यानंतर संघात भाजपाप्रती असंतोषाची भावना दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या मुखपत्रातून आणि संघ परिवारातील काही सदस्यांकडून भाजपावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की भाजपा आणि संघामध्ये काय घडतंय? यावर एक नजर टाकू या.

भाजपाचा ‘अहंकारी’ असा उल्लेख

या आठवड्यात संघाच्या नेतृत्वाने भाजपाबद्दल दोनदा टीका केली, जो राष्ट्रीय राजकरणात चर्चेचा विषय ठरला. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. वर्षभरापासून धगधगत असलेल्या मणिपूर प्रश्नावर उपाय का झाला नाही, असाही त्यांचा रोख होता. त्यानंतर ज्येष्ठ संघ नेते इंद्रेश कुमार यांनीही लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात मोठे वक्तव्य केले आणि भाजपाचा उल्लेख अहंकारी असा केला. “ज्यांनी भगवान रामाची पूजा केली, पण गर्विष्ठ झाले, त्यांना २४१ वर रोखले,” असे वक्तव्य त्यांनी केले. भाजपाने लोकसभेच्या २४० जागा जिंकल्याचा हा स्पष्ट संदर्भ होता.

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एनडीएसमोर ‘ही’ आव्हाने

दीप्तीमन तिवारी यांनी सांगितले की, संघ इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. ते त्यांचे स्वतःचे मत आहे. असे असले तरीही या सर्व घडामोडीत एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की, संघ आणि भाजपामध्ये एकरूपता नाही. संघप्रमुखांच्या टिप्पण्यांनंतर एका स्रोताने ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या उपसंपादक लिझ मॅथ्यू यांना सांगितले की, “सार्वजनिक टिप्पणींचा स्पष्ट अर्थ म्हणजे संघ आणि पक्ष यांच्यात मतभेद आहेत. भागवतजी क्वचितच भाजपा नेत्यांवर जाहीरपणे टीका करतात.”

“अजित पवार यांना सहभागी केल्याने भाजपाची ब्रॅंड व्हॅल्यू कमी”

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या महत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यांमध्ये भाजपाची कामगिरी घसरल्याची तीन कारणे भाजपाच्या नेत्यांनी स्पष्ट केली. त्यातील मुख्य कारण म्हणजे अयोग्य निवडणूक व्यवस्थापन, ज्यामुळे भाजपाला मतदारांना एकत्रित आणता आले नाही. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने लिझ मॅथ्यू यांना सांगितल्याप्रमाणे, भाजपाने भ्रष्टाचारविरोधी आणि घराणेशाहीविरोधी राजकारण या दोन मोठ्या मोहिमा राबवून अजित पवार यांच्यासह जेडी(एस) व टीडीपीसारख्या पक्षांना सहभागी करून घेतले, जे भाजपाच्या अपयशाचे कारण ठरले. अलीकडेच संघाचे मासिक ‘ऑर्गनायझर’मध्येही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला.

महाराष्ट्रात अजित पवार यांच्याबरोबर युती केल्याने भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कशी कमी झाली आणि भाजपा दुसर्‍या क्रमांकावर कसा आला? याविषयी या मासिकात लिहिण्यात आले आहे. उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाल्यास, उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत वादाचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला. माजी केंद्रीय मंत्री संजीव बलियान आणि माजी आमदार संगीत सिंह सोम यांच्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याचे आणि सध्या पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचेही स्पष्ट होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये भागवत यांची भेट घेतली असल्याचीही माहिती आहे. येत्या काही दिवसांत या सर्व गोष्टी कशा आकार घेतील, सत्ताधारी पक्षाची वाटचाल कशी होईल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असेल, हे ज्वलंत प्रश्न आहेत, ज्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : इलेक्शन ड्युटीवर असताना उष्णतेमुळे मिर्झापूरच्या पाच होमगार्डचा मृत्यू; त्यांच्या मृत्युला जबाबदार कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षाची पुढील भूमिका काय?

२४ जून ते ३ जुलै या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होण्याचा अंदाज आहे. विशेष अधिवेशनातील विरोधकांच्या भूमिकेकडे आणि विरोधी पक्षनेता कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या तरी याबाबत फारशी स्पष्टता नाही. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ जून रोजी युतीची शेवटची मोठी बैठक दिल्लीत पार पडली होती. काँग्रेस आणि सपा यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, उत्तर प्रदेशमध्ये ते युती कायम ठेवण्याचा विचार करत आहेत, तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत केवळ दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि गोव्यात युती म्हणून लढले होते; जे कदाचित आगामी काळात युती म्हणून लढणार नाहीत. हरियाणातील निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत, तर दिल्लीत पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. आगामी काळात विरोधी पक्षांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.