काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याबाबत शशी थरूर गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही.

महाराष्ट्रातील नेत्यांचे नावही चर्चेत

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाही याबाबत सध्या भाष्य करण्यास शशी थरुर यांनी नकार दिला आहे. यापूर्वी त्यांनी मल्याळम दैनिक मातृभूमीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकीवर एक लेख लिहिला आहे. ज्यामध्ये त्यांनी “मुक्त आणि निष्पक्ष” निवडणुकांचे आवाहन केले आहे. तसेच पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत. काँग्रेससाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल शशी थरूर यांच्यासह मनीष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं चर्चेत आहेत.

काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांमध्ये शशी थरूर यांचाही समावेश

थरूर यांनी लेखात लिहिले आहे, “पक्षाने CWC सदस्यपदासाठी निवडणुकीची घोषणा करायला हवी होती. पक्षाच्या या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची एआयसीसी आणि पीसीसी सदस्यांना परवानगी दिली पाहिजे. पक्षात संघनात्मक बदल करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांमध्ये शशी थरुर यांचाही समावेश आहे.

राहुल गांधीच्या नावाला पहिली पसंती

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. या निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी ही खुली निवडणूक आहे. कोणीही त्यात भाग घेऊ शकतो. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी राहूल गांधींच्या नावाला पहिली पसंती देण्यात आली आहे. परंतु राहुल गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यात कोणताही रस असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.