हिमाचल प्रदेश येथील पोलिस अधीक्षकांनी (एसपी) स्वतःच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे एकूणच हिमाचल प्रदेशमधील वातावरण तापले आहे. याचा परिणाम तेथील राजकारणावरही होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शिमलाचे पोलिस अधीक्षक संजीव गांधी यांनी हे आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या मते ते मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या जवळचे आहेत. हिमाचल प्रदेश पोलिस सेवेतील अधिकारी संजीव गांधी यांना २०१७ मध्ये आयपीएस म्हणून बढती मिळाली. त्यांच्याकडे राज्य सरकारने चौकशीसाठी अनेक संवेदनशील प्रकरणे सोपवली आहेत. हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीपीसीएल) चे मुख्य अभियंता विमल नेगी यांच्या आत्महत्येचे प्रकरणही संवेदनशील होते. आता याच प्रकरणावरून नवीन वाद सुरू झाला आहे.
प्रकरण काय?
विमल नेगी यांच्या पत्नीने एचपीपीसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. २४ मे रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आणि राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना एसआयटीमधून बाहेर ठेवण्याचे निर्देश दिले. त्याच्या एका दिवसानंतर, संजीव गांधी यांनी पोलिस महासंचालक (डीजीपी) अतुल वर्मा यांच्यावर न्यायालयात दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केला. त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू नये अशी विनंतीही केली.
संजीव गांधींनी अतुल वर्मा यांच्या कार्यालयावर ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असल्याचा आणि ‘समोसा’ वादाचा तपास अहवाल लीक केल्याचाही आरोप केला. हा वाद मुख्यमंत्री सुखू यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी आणखी एका माजी अधिकाऱ्यावर जुलै २०२३ च्या गॅस गळती स्फोट प्रकरणाला दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप देण्यासाठी आरडीएक्स ठेवल्याचाही आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पोलिस अधीक्षकांनी ही मुलाखत कशी घेतली, असे प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर सुखू यांनी अखेर या प्रकरणी कडक कारवाई केली. २७ मे रोजी त्यांनी डीजीपी वर्मा, एसपी गांधी आणि मुख्य सचिव ओंकार शर्मा या तिघांनाही रजेवर पाठवले. त्याच्या काहीच दिवसांनी वर्मा औपचारिक निरोप न घेताच निवृत्त झाले.
संजीव गांधींसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्चर्यकारक पाऊल
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संजीव गांधी वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, डिसेंबर २०२२ मध्ये हिमाचलमध्ये काँग्रेसने सत्ता हाती घेतल्यानंतर काही फेरबदल केले. त्या फेरबदलांपैकी एक म्हणजे सुखू सरकारने संजीव गांधींना शिमला पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त केले, हे पाऊल आश्चर्यकारक होते. अधिकाऱ्याने म्हटले, “ते त्यावेळी हिमाचल प्रदेश सशस्त्र पोलिसांचे कमांडंट होते, भाजपाच्या काळात त्यांनी बराच काळ लो-प्रोफाइल पद भूषवले होते.” २०१७ मध्ये, ते कांगडा येथे पोलिस अधीक्षक असताना गांधींची १५ दिवसांत तीनदा बदली करण्यात आली होती. मुख्य म्हणजे, त्यावेळचे सरकारदेखील वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार होते.
संजीव गांधी यांचे सहकारी सांगतात की, खाणकाम आणि ड्रग्ज सिंडिकेटवरील प्रकरणे उघडकीस आणण्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. ऑगस्ट २०२४ मध्ये भाजपाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ड्रोनचा वापर करून त्यांची हेरगिरी केल्याचा आरोप संजीव गांधींवर केला. पोलिस अधिकारी म्हणाले, “ठाकूर यांनी आरोप केला की गांधींच्या शेजारी असलेल्या घरातून ड्रोन चालवले जात होते. हे आरोप निराधार ठरवण्यात आले. मुख्यमंत्री सुखूने सभागृहाला सांगितले की, सिमला जल प्रबंधन निगम लिमिटेडने जीआयएस मॅपिंगसाठी ड्रोन तैनात केले होते.”
संजीव गांधी आणि भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांमधील वाद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे माजी मुख्यमंत्री ठाकूर आणि गांधी यांच्यातील मतभेद अनेक वर्षांपूर्वीचे आहेत. गांधी मंडी येथे पोलिस अधीक्षक असताना व्हिजिलन्स म्हणून नियुक्त होते आणि ठाकूर मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार होते. भाजपातही संजीव गांधींचे काही चाहते आहेत. माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी राज्यातील ड्रग्ज व्यापाराविरुद्ध त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. पोलिस सूत्रांनी संजीव गांधी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांविरुद्ध गेल्याची उदाहरणे दिली.
जसे की नेगी यांच्या आत्महत्येचा सध्याचा खटला, २०२१-२२ मध्ये पोलिस भरतीदरम्यान झालेली विसंगती आणि २०२३ मध्ये एका व्यावसायिकाचा समावेश असलेले पालमपूर प्रकरण. अभियंत्याच्या आत्महत्येवरील वादानंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना संजीव गांधी म्हणाले होते, “आपण सर्व जण एका व्यवस्थेचा भाग आहोत. माझे अनेक वरिष्ठांशी तसेच पक्षाच्या पलीकडे असलेल्या राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. परंतु, जेव्हा मी माझ्या काही वरिष्ठांना पाहतो की, ते बेकायदा आणि अनैतिक वाटणाऱ्या गोष्टीवर निर्णय घेत नाही, तेव्हा मला त्रास होतो.”
कोण आहेत संजीव गांधी?
सोलन जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजीव गांधी हे वकिलांच्या कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये कायद्याचे माजी प्राध्यापक होते. संजीव गांधी यांनी १९९९ मध्ये राज्य पोलिस सेवेत येण्यापूर्वी स्वतः हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात वकिली केली होती. त्यांच्या पत्नी निशा ठाकूरदेखील एक वकील आहेत.
भाजपाची टीका अन् काँग्रेसची प्रतिक्रिया
भाजपाचे श्री नैनादेवीचे आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते रणधीर शर्मा म्हणाले, “जर एखादा पोलिस अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत असेल आणि मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले असेल की त्यांचे सरकार त्याला आव्हान देणार नाही, तर त्याचा काय परिणाम होतो? एकतर पोलिस अधिकारी राज्य सरकारपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा सरकार पोलिस अधिकाऱ्याच्या या कृतीशी सहमत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले, संजीव गांधींच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता. अनेकवेळा राज्य सरकारांकडून सक्षम पोलिस अधिकाऱ्यांचा गैरवापर केला जातो आणि या प्रकरणात ते स्पष्ट आहे.”
एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “संजीव गांधींना प्रतिष्ठित शिमला पोलिस अधीक्षक पद मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड. विशेषतः त्यांचे ड्रग्जविरुद्धचे काम. ते एक सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर एकही आरोप नाही.” परंतु, त्यांनी पुढे असेही म्हटले की, संजीव गांधींनी स्वतःला या वादात ओढले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या वरिष्ठांवर हल्ला करून स्वतःचे नुकसान केले. आता त्यांचे समर्थकही त्यांच्या बाजूने उघडपणे बोलण्यास विचार करत आहेत.