छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीपासून ते हमीभाव वाढवून देण्यापर्यंतच्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाच्या वतीने ‘ क्या हुआ तेरा वादा’ या घोषवाक्यासह आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीनला सहा हजार प्रतिक्विंटल भाव देऊ तसेच कर्जमाफी करू, असेही सांगितले होते. सरकार त्यांचे आश्वासन विसरत असल्याने त्यांना आठवण करुन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेकडून ५ ते १२ जून कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आखण्यात आले असून खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख यांनी प्रत्येकी तीन गावात बैठका घ्याव्यात असे सांगण्यात आले आहे, प्रत्येक गावात ‘ क्या हुआ तेरा वादा’ असे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून १२ जून रोजी रस्तारोको आंदोलन केले जाणार आहे. मराठवाड्यात सर्वत्र हे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आखण्यात आल्याचे सांगण्यात आले. कर्जमाफी तर करता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्चच्या शेवटी आवर्जून सांगितले. त्यामुळे तेव्हापासून सरकारवर विरोधक टीका करत आहेत. या शिवाय सोयाबीनला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेणे आवश्यक झाले आहे.

व्यापारी बँकांनी हात आखडते ठेवू नयेत, अशा सूचना सरकार पातळीवरुन जरी देण्यात आल्या असल्या तरी पीक कर्ज आणि पीक विमा या दोन्ही योजनांमध्ये अनेक बदल करण्याची आवश्यकता असल्याच्या मागण्या विविध स्तरावरुन केल्या जात आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने आता या प्रश्नावरुन आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनापूर्वी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एक बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीस धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचीही उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोनाविषयी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले, ‘त्यांच्या पक्षासमोर अस्तित्वाचेच प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे अनेक निर्णय लाभकारक आहेत. वीज देयक माफ झालेले आहे. सौर कृषीपंपाची योजना वेगवान आहे. शेतकरी सन्मान निधीही मिळतो आहे. असे अनेक निर्णय असताना केवळ विरोध करायचा म्हणून हे आंदोलन सुरू आहे. खरे तर त्यांच्याकडे सकाळी त्यांच्या मंचावर असणारा कार्यकर्ता त्यांच्या बाजूला नसतो. त्यामुळे या आंदोलनातून फार काही होणार नाही.