छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फूटीनंतर मराठवाड्यातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या नऊ आमदारांसह माजी मंत्री अर्जून खोतकर आणि खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना शिवसेना ( एकनाथ शिंदे ) गटाने उमेदवारी दिली. यातील नांदेडचे बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, वगळता बहुतांश उमेवार वादाच्या रिंगणात उभे आहेत. मात्र, या वादांचा निवडणुकांवर काही एक परिणाम होणार नाही, असा दावा शिवसेनेच्या वतीने केला जातो. मराठवाड्यातील मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार संतोष बांगर ही नावे तर सतत वादात होती.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आपल्या पहिल्या वक्तव्यापासून ते कार्यशैलीमुळे सतत चर्चेत होते. ‘ कोण तो हाफकिन?, त्याच्याकडून औषध घेणे बंद करा ’ असे ते म्हणाले. हाफकिन हा माणूस महाराष्ट्रात राहतो आणि त्याला आपल्याला सूचना देता येतात, असा त्यांचा समज असल्याचे चित्र माध्यमांमधून प्रस्तुत झाले होते. मात्र, त्यावर खुलासा करत माझे शैक्षणिक आर्हता माध्यमांनी तपासावी. हे सरकार आल्याचे माध्यमांना रुचले नाही. म्हणून त्यांनी त्यांनी हे वक्तव्य पसरविल्याचा त्यांचा खुलासा होता. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री असताना कोकाणातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण वाहून गेल्याने ३० अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा हा बंधारा खेकड्यांनी माती पोखरल्यामुळे वाहून गेल्याचे निष्कर्ष सावंत यांनी माध्यमांमध्ये सांगितले. ‘ अजित पवार यांच्या शेजारी बसताना उलटी व्हायला होते’, असेही ते अलिकडेच म्हणाल्याने वाद झाले होते. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे यावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना फोडण्यासाठी मदत केल्याचे जाहीरपणे सावंत यांनी केलेले वक्तव्य गाजले होते. सतत वादाच्या रिंगणातील तानाजी सावंत आता पुन्हा परंडा मतदारसंघातून निवडणुकीत उभारणार आहेत.

हेही वाचा : Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?

शिंदे मंत्रिमंडळातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भोवतीही सतत वादाचे रिंगण होते. आपल्या कार्यशैलीने आणि वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोरही त्यांनी अडचणी निर्माण केल्या. त्यांनी कृषीमंत्री म्हणून बियाणांच्या तपासणीसाठी एक नवीच यंत्रणा उभी केली. त्यामुळे विधिमंडळात त्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या. शेवटी त्यांना अल्पसंख्याक मंत्री पद दिल्यानंतर काही अंशी त्यांच्याविषयीचे वाद कमी झाले. सिल्लोड कृषी महोत्सवात तिकिट लावण्यापासून ते लोकसभा निवडणुकीनंतर ‘ शिवसेनेबरोबर माझा प्रासंगिक करार आहे’ असे म्हणण्यापर्यंतची वक्तव्ये करुनही सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिशी घातलयाचे चित्र सत्ताधारी गटात होते. त्यांनी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. याच काळात सत्तार यांनी जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवले. दूध संघाच्या राजकारणातही सिल्लोडचे पारडे जड राहिले. मतदारसंघ राखणाऱ्या वादग्रस्त सत्तार यांना सत्तेच्या शेवटच्या काळात पालकमंत्री पदही देण्यात आले. त्यामुळे सिल्लोडमधून त्यांना शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षाकडून उमेदवारी मिळेल असेच मानले जात होते. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर सत्तार हेच शिवसेनेचे पहिल्या यादतील एकमेव मुस्लिम उमेदवार असतील असे स्पष्ट झाले आहे. आपल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या घरावरही दगडफेक झाली होती. त्यामुळे सतत वादाच्या रिंगणातील व्यक्तीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विश्वास दाखविल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील तिसरे वादग्रस्त आमदार म्हणजे संतोष बांगर. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अगदी डोळ्यात पाणी आणून दाेन दिवस उद्धव ठाकरे बरोबर असणारे बांगर नंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पीक विमा न देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्या मारहाण करण्यापासून ते त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनीही आक्षेप घेतले होते. कळमनुरीमधून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बाहेरुन मतदारसंघात येणाऱ्या मतदारांना ‘ फोन पे ’ करा या वक्तव्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. वादाच्या रिंगणातील हे तिसरे उमेदवार.

हेही वाचा : उमेदवारी यादीत पक्षांना ‘नऊ’ आकड्याची भुरळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध वादातील दोन मंत्री आणि आमदारांना सांभाळताना मराठवाड्यातून पुन्हा एकदा शिवसेनेचे बळ वाढविले ते संदीपान भुमरे यांनी. मद्य विक्री हा व्यावसाय असल्याचे शपथपत्रात नमूद केल्यानंतर शिवसेना ( उद्धव ठाकरे ) गटाने ‘ मद्यसम्राट ’ उमेदवार अशी वारंवार टीका करुन लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांच्या मुलास उमेदवारी देण्यात आली आहे. वडील रोजगार हमी मंत्री असताना ‘ शासन आपल्या दारी’ उपक्रमातून ‘ जनता दरबार’ भरविणारे विलास भुमरे यांना शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पैठणची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचा उमेदवार अद्यापि ठरलेला नाही. सत्ताधारी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात विकासासाठी वितरित करण्यात आलेल्या निधी आकडे हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरवला जात आहे.