Allu Arjun Pushpa 2 Stampede Controversy : अल्लू अर्जुन आणि त्याचा सुपरहिट चित्रपट पुष्पा : द रुल हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनचे पात्र विद्यमान मुख्यमंत्र्यांची राजवट उलथून टाकताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही पटकथा तेलंगणामध्ये सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे, कारण तेलुगु स्टार अल्लू अर्जुन आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.

अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ च्या शोदरम्यान ४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या शोसाठी अभिनेता अल्लू अर्जुन देखील उपस्थित होता. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ज्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती. सध्या अल्लू अर्जुन हा जामीनावर बाहेर आहे. तर यादरम्यान विधानसभेत काँग्रस आणि एआयएमआयएमकडून टीका करण्यात आली. यातच काही जणांनी रविवारी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड केल्याचा प्रकारही समोर आला आहे

चित्रपट सृष्टीत सिनेतारकांना भरपूर मान सन्मान मिळतो, तसेच या सन्मानाचा राजकीय लाभासाठी देखील फायदा घेतला जातो, यादरम्यान अल्लू अर्जूनला राज्य सरकारकडून होत असलेला विरोध हा आश्चर्य वाटावा असा आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या जवळच्या सुत्रांच्या म्हणण्यानूसार ते एक पाऊल मागे घेण्याच्या विचारात आहेत आणि घडलेला प्रकार हा त्यांचे सरकार प्रत्येकाशी समानतेने कसे वागते याचे उदाहरण म्हणून सादर केले जात आहे. यातच रविवारी अल्लू अर्जुनने मतभेद दूर करण्यासंबंधात एक इंस्टाग्राम पोस्ट देखील केली आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये आपल्या चाहत्यांना आपल्या भावना जबाबदारीने व्यक्त करण्याची विनंती केली आहे. तसेच कोणतीही अपमानास्पद भाषा किंवा वर्तन करू नका असे सांगत त्याने असे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असेही म्हटले आहे.

सरकारचे म्हणणे काय आहे?

अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर महिलेचा ९ वर्षांचा मुलगा हा गंभीररित्या जखमी झाला आहे. रेवंत रेड्डी सरकारचे म्हणणे आहे की, अभिनेता अल्लू अर्जून चित्रपटगृहात उपस्थित राहाणार असल्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तर दुसरीकडे अर्जुन याला तत्काळ परिसर सोडण्यास सांगण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तर अभिनेत्याने आपण पोलिसांना कल्पना दिली होती असे म्हटले आहे.

रेवंत रेड्डी यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी अल्लू अर्जुनचे नाव एफआयआरमध्ये आल्यानंतर सर्व कारवाई कायद्यानुसार होईल असे स्पष्ट केले होते. पण जेव्हा पोलिसांनी अर्जुनला अटक केली तेव्हा रेवंत रेड्डी यांच्यावर टीका होऊ लागली. अल्लू अर्जुन याच्यावर अन्याय करत त्याला लक्ष्य केले जात आहे, अशा पद्धतीची वक्तव्य करण्यात आली”.

हेही वाचा>> छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलून अजित पवारांनी २००९ चा राजकीय बदला घेतला?

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका सहकाऱ्याने बोलताना सांगितले की, “जामीन मिळाल्यानंतर तेलुगु चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जून याला असे भेटते होते जसं की तोच पीडित आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या बाजूने बोलून रेवंत रेड्डी यांना दाखवून द्यायचे होते की, याविरोधात ते पीडित कुटुंबाच्या बाजूने उभे आहेत”. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांसमोर फक्त एकच प्रश्न होता, तो म्हणजे ज्याच्यावर आरोप झालेत त्या अभिनेत्याला पाठिंबा द्यावा की पीडित कुटुंबियांच्या बाजूने उभे राहावे?”. तर रेवंत रेड्डी यांच्या जवळच्या दुसऱ्या एका सूत्राने दावा केला की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.

काँग्रेस नेत्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्‍यांकडून सूचना देण्यात आल्या होत्या की राजकीय दबाव असला तरी मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांना पाठिंबा द्या “. तसेच एका सुत्राने सांगितले की “मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले होते की, तेलुगु चित्रपट क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली कुटुंबांपैकी एक काही कायद्याच्या वर नाही.

दुसऱ्या एका सुत्राने दावा केला की, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना अभिनेत्याचे औदासीन्य दाखवून द्यायचे होते. त्यामुळे राज्य सरकारने जखमी मुलाच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. दुसरीकडे अल्लू अर्जुनने पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत दिली. तर पुष्पा २ चे निर्माते Mythri Movies यांनी ५० लाखांची मदत केली. अर्जुनने यापुढेही आपण त्या पीडित कुटुंबाला मदत करू असेही जाहीर केले . यादरम्यान चाहते गर्दी करतील यासाठी अर्जुनला पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

२१ डिसेंबर रोजी रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा विधानसभेत दावा केला होता की, अल्लू अर्जुनने पोलिसांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून देखील संध्या चित्रपटगृह सोडले नाही. मात्र अल्लू अर्जुनने त्याच दिवशी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत, आपण बाहेर गोंधळ झाल्याचे लक्षात आल्याबरोबर चित्रपटगृहातून निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेच्या मृत्यूसंबंधी आणि त्यांचा मुलगा जखमी असल्याबद्दल आपल्याला समजल्याचे म्हटले आहे. तसेचे अल्लू अर्जुनने पुढे, “आपण पोलीस किंवा सरकार यापैकी कोणालाही दोष देणार नाही. ही घटना अत्यंत दुर्देवी असून हे घडायला नको होते”, असेही म्हटलेय

दरम्यान काही जणांचे म्हणणे आहे की प्रकरणाच्या यामाध्यमातून रेवंत रेड्डी यांनी एकप्रकारे राजकीय संदेश दिला आहे. कारण अल्लूअर्जुन हा प्रसिद्ध निर्माता अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे, ज्यांची बहीण सुरेखा यांनी तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीबरोबर लग्न केले आहे. चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण हे स्वतः एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आहेत, याबरोबरच ते भाजपाचे सहकारी आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री देखील आहेत .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान रविवारी संध्याकाळी अल्लू अर्जुन याच्या निवासस्थानी सहा जणांनी फुलांच्या कुंड्या फोडल्या आणि टोमॅटो फेकल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर भाजपा खासदार डीके अरुणा यांनी दावा केला की या सहा जणांपैकी चार कोडंगल या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत. सोमवारी या प्रकरणात पोलि‍सांनी अल्लू अर्जुनला नोटीस बजावली आणि मंगळवारी हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.