K. Kavitha vs KT Rama Rao : तेलंगणातील प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे नेतृत्व सध्या संघर्षाच्या गराड्यात अडकले आहे. सलग १० वर्ष राज्याची सत्ता उपभोगणाऱ्या या पक्षात बंडाचे संकेत मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता या त्यांचे व बंधू तथा पक्षाचे कार्याध्यक्ष के.टी रामाराव यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. भारत राष्ट्र समितीला भाजपामध्ये विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर कविता यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे बीआरएस पार्टीत मोठी फूट पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात के. कविता यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या पत्रात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली होती. आज मंगळवारी, माध्यमांशी बोलताना कविता यांनीपक्षातील अंतर्गत कुरघोड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “भारत राष्ट्र समिती पक्षाला आतूनच कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, पक्षाला भारतीय जनता पक्षात (भाजप) विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहेत”, असं के कविता यांनी म्हटलं आहे.
केसीआर यांना लिहिलेल्या पत्राबाबत कविता काय म्हणाल्या?
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर के. कविता यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मी केसीआर यांना शेकडो पत्रं लिहिली आहेत. त्यात काय चुकीचं आहे? असा प्रश्न कविता यांनी विचारला. “माझं पत्र कोणी लीक केलं हे मला जाणून घ्यायचं आहे. पण दोषी शोधण्याऐवजी पक्षाचे नेतृत्व सातत्याने मला लक्ष्य करीत आहेत,” असं त्यांनी सांगितलं. के. कविता यांनी असाही आरोप केला की, केसीआर यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगत काही लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याने माझी फसवणूक झाली.
आणखी वाचा : नितीश कुमारांची कोण करतंय कोंडी? एनडीएमध्ये जागावाटपावरून वाद होणार?
भारत राष्ट्र समिती पक्षाला भाजपामध्ये विलीन करण्याच्या कथित प्रयत्नांना कविता यांनी तीव्र विरोध केला आहे. “मी तुरुंगात असताना बीआरएसला भाजपात विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. तेव्हाही मी त्याला विरोध केला होता आणि आजही करत आहे,” असं कविता यांनी म्हटलं आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू चंद्राबाबू नायडू यांसारख्या मध्यस्थांद्वारे आमच्या पक्षाच्या विलिनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही के. कविता यांनी केला आहे. बीआरएसला भाजपात विलीन करून नका, मी हे होऊ देणार नाही. त्यासाठी वर्षभर जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
“पक्षातील नेत्यांकडून माझ्याविरोधात कटकारस्थान”
अलीकडील निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात कटकास्थान रचले होते. त्यांनी निवडणुकीत माझ्या पराभवासाठी कट रचला होता, असा थेट आरोप के. कविता यांनी केला. “बीआरएस पक्ष आज इतका कमकुवत का झाला आहे? पक्षातील काही लोक लपून छपून भाजपाशी हातमिळवणी करीत आहेत का? भाजपच्या नेत्यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन कुणी केलं? हे केसीआर यांनी तपासायला हवं”, असंही के. कविता म्हणाल्या. “माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला लागलेली गळती थांबवली पाहिजे आणि घुसखोरीवर नियंत्रण ठेवायला हवं. जर पक्षाची ही कमकुवत अवस्था कायम राहिली, तर भाजपा आणि काँग्रेस दोघांनाही आपली जागा निर्माण करण्याची संधी मिळेल”, असा सल्लाही के. कविता यांनी दिला.
के. चंद्रशेखर राव यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यानंतर के. कविता यांच्यावर अनेकजण टीका करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलताना “काही लोक आणि काही माध्यमं माझ्यावर खोट्या बातम्यांच्या माध्यमातून टीका करीत असताना पक्षातील नेते शांत का आहेत? असा प्रश्न कविता यांनी उपस्थित केला. “पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका झाली, तेव्हा पक्षाने त्यांचं लगेच समर्थन केलं. पण माझ्या बाबतीत मात्र असं झालं नाही. माझ्याविरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करू नका. मी बोलायला लागले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील”, असा थेट इशाराही के. कविता यांनी टीकाकारांना दिला.
हेही वाचा : भाजपाचं ‘या’ राज्यातील सरकार गोत्यात? मुख्यमंत्र्यांविरोधात मोठं आंदोलन होणार?
के. कविता नवीन राजकीय पक्ष काढणार?
राजकीय भविष्याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर कविता यांनी मान्य केलं की, त्यांना बीआरएसमधून डावलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या म्हणाल्या की, मला भारत राष्ट्र समिती पक्षातून बाजूला करण्याचा कट रचला जातो आहे. परंतु, मी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी प्रामाणिक आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात काम करणार, असं के. कविता यांनी म्हटलं आहे. नवीन पक्ष स्थापन करण्याबाबत विचारल्यानंतर कविता यांनी तो पर्यायही नाकारला नाही. “मी असं का म्हणावं की, नवीन पक्ष कधीच स्थापन करणार नाही? भविष्यात काय होईल कोण जाणे”, असे संकेत देत त्यांनी संभाव्य राजकीय निर्णयांची दारे उघडी ठेवली आहेत.
के. कविता यांना झाली होती अटक
गेल्या वर्षी दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने के. कविता यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. के. कविता जवळपास पाच महिने तुरुंगात होत्या आणि नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. “मी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली असली तरी, पक्षातील काही लोक माझ्याविरोधात गुप्त कारवाई करीत आहेत,” असं के. कविता यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. भारत राष्ट्र समिती हा पक्ष सध्या कमकुवत झाला आहे का? त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “बीआरएस पक्ष सध्या राज्यातील सत्तेबाहेर असला तरी, तो कमकुवत झाला असं मला वाटत नाही. तसे झाल्यास भाजपाला याचा मोठा फायदा होईल. भारत राष्ट्र समितीला कोणत्याही पक्षात मग ते भाजपा असो की काँग्रेस विलीन होण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न झाले पाहिजेत,” असं के. कविता यांनी म्हटलं आहे.