‘दादानिष्ठ’ अशी राजकीय पटलावर ओळख असणाऱ्या संजय बनसोडे यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून संधी मिळाली. लातूर जिल्ह्यात काँग्रेसच्या मंत्र्यांना उत्तम खाती मिळत. संभाजी पाटील निलंगेकरांऐवजी लातूर जिल्ह्यातील राजकारण आता अजित दादा यांच्या वर्चस्वाखाली सुरू होणार आहे. मात्र, हे करताना मंत्री म्हणून ठरविलेली कामे कमी कालावधीमध्ये पार पाडणे संजय बनसोडे यांच्यासमोरील आव्हान आहे. या आव्हानांविषयी त्यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली बातचित.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची नेमकी कल्पना काय आहे?

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा यापूर्वीच झाली आहे. राज्यातील पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांमध्ये हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. कुलगुरूंची नियुक्ती करून या कामाला गती द्यायची असून एका शहरात विद्यापीठ होईल, वगळल्या गेलेल्या दुसऱ्या शहरांमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र करून आपण कामाला गती देणार आहोत.

हेही वाचा – विरोधकांच्या बैठकीमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या फुटीचे पडसाद?

ऑलिम्पिक भवनची नेमकी काय कल्पना आहे?

ऑलिम्पिक दर्जाचे खेळ, त्यासंबंधीचे प्रशिक्षण खेळाडूंना दिले गेले पाहिजे. यापूर्वी गुजरात, हरियाणा, पंजाब अशा प्रांतातील खेळाडूंसाठी असे भवन उभारून त्यांना अधिक उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी ही सोय व्हावी यासाठी आपण राज्यात ऑलिम्पिक भवन उभे करणार आहोत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू मागे पडू नयेत यासाठीच्या काय कल्पना आपल्या मनात आहेत?

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक खेळात चमकले पाहिजेत. आशिया क्रीडा स्पर्धा पॅरिस येथे होणार आहे. त्या दृष्टीने या खेळाडूंना सरकारची सर्व प्रकारची मदत दिली जाईल. बारा मुद्दे लक्षवेधी आहेत त्याआधारे खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. २०२४-२८ व २०३२ चे ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने खेळाडू तयार होण्याचे नियोजन केले जाणार आहे.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना गोंजारण्याची चढाओढ

महाराष्ट्र सरकारचे नेमके क्रीडा धोरण काय आहे? त्यात काही बदल करणार आहात का?

महाराष्ट्र सरकारचे क्रीडा धोरण निश्चित असले तरी ते ठरवून अनेक वर्षे झालीत, त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. नव्याने महाराष्ट्र राज्याचे क्रीडाविषयक ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार केले जाणार आहे. त्यात खेळाडू प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करून अद्यावत पद्धतीचे व दीर्घकालीन उपाय योजना सुरू करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

भारतीय खेल प्राधिकरणाबरोबर समन्वय कसा असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर व या विभागाचे केंद्रीय सचिव संदीप प्रधान यांच्याशी आपण प्रत्यक्ष भेट घेऊन बोलणार आहोत. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रात विविध ठिकाणी केंद्र सुरू केले जावेत व केंद्र सरकारचा निधी या उपक्रमासाठी उपलब्ध व्हावा यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार आहोत व राज्यातील खेळाडूंच्या आताच्या तातडीच्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्या त्वरेने सोडवण्यासाठी आपण नियोजन करणार आहोत. भविष्यातील धोरण ठरवताना क्रीडा क्षेत्रातील सर्व जाणकारांशी चर्चा करून त्यांची मते घेऊन त्यानंतरच धोरण निश्चित केले जाईल.