Why Congress Lost Election in Gujarat : गुजरातमधील विसावदर आणि कडी या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या दोन्ही जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विसावदर मतदारसंघात आम आदमी पार्टीने विजय मिळवला, तर कडी मतदारसंघावर भाजपाने आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं. २०२७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी पक्षाला राज्यात सातत्याने अपयश येत असल्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे झाला? काय आहेत यामागची कारणे? याबाबत जाणून घेऊ…
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील पक्षसंघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी ‘संगठन सृजन अभियान’ राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस आधीच काँग्रेसने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम पूर्ण केला. त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) निरीक्षकांच्या देखरेखीखाली राज्यातील ४० जिल्हा काँग्रेस समित्यांच्या (DCC) अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं.
गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी विसावदर आणि कडी या दोन पोटनिवडणुकांतील पक्षाच्या पराभवानंतर स्वतःला नैतिकदृष्ट्या जबाबदार ठरवत राजीनामा जाहीर केला, तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विशेष बाब म्हणजे, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, आम्हाला या पोटनिवडणुका जिंकण्याची अपेक्षा नव्हतीच, त्या जागा आमच्या नव्हत्याच.
आणखी वाचा : शशी थरूर यांच्या परदेश दौऱ्यांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता? कारवाईची नेमकी का होतेय चर्चा?
गुजरातमध्ये काँग्रेसला कशामुळे आलं अपयश?
- गुजरातमधील कडी हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो.
- त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची बाजू नेहमीच कमकुवत मानली जाते.
- दुसरीकडे, विसावरदर मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवता आला असता.
- कारण, २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता.
- मात्र, त्यावेळी निवडून आलेले आमदार हर्षद रिबाडिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला.
- २०१७ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पाटीदार आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या.
- ज्यामध्ये काँग्रेसने अनेक दशकांतील सर्वोत्तम कामगिरी करत १८२ पैकी तब्बल ७७ जागा जिंकल्या होत्या.
२०२२ मध्येही काँग्रेसचा झाला होता पराभव
२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षद रिबाडिया हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार भूपण भयाणी यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या निवडणुकीत ‘आप’ने पाच आमदारांसह पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला, तर काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले, ही त्यांची सर्वात वाईट कामगिरी ठरली.
पाटीदार बहुल असलेला विसावदर मतदारसंघ पक्षांतर करणाऱ्यांना नाकारतोय असे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. साबरमती नदीच्या काठी असलेल्या एका गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार निवडून आला, तर भाजपा मंत्र्याच्या मुलाला पराभवाला सामोरे जावे लागले. हे निकाल सत्ताविरोधी लाटेचे संकेत देत असले तरी काँग्रेस नेते याला मान्य करायला तयार नाहीत. काहींनी गोपाल इटालिया यांच्या विजयामागे भाजपाचा हात आहे, तर काहींनी पाटीदार समाजाचे मत ध्रुवीकरण झाले, असा दावा केला आहे.

काँग्रेस नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू
काँग्रेसचे नेते परेश धनाणी यांनी असा आरोप केला की, मतदानाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी विसावदरमध्ये गोपाल इटालिया यांच्या कार्यकर्त्यांना दारू वाटताना पकडले होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सौराष्ट्रातील एका काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जर खरंच गुजरातमधील मतदार आम आदमी पार्टीच्या दिशेने झुकले असते, तर कडी मतदारसंघात त्यांना इतक्या दारुण पराभवाचा सामना करावा लागला नसता. काँग्रेसचे एक आमदार म्हणतात, “आम आदमी पार्टीने सुरुवातीपासूनच धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायासारख्या मुद्द्यांना स्पर्श केला नाही, जे काँग्रेसचे मुख्य आधारस्तंभ आहेत.” ते पुढे म्हणतात, “मुस्लीम, दलित आणि आदिवासी समुदायांसाठी आवाज उठवणारा एकमेव पक्ष म्हणून काँग्रेसला ओळखलं जातं; पण या दोन जागांवर आम्ही पुरेसे प्रयत्न केले नाहीत.”
हेही वाचा : जॉर्ज फर्नांडिस : रेल्वे संपाचा नायक आणि हुकूमशाहीविरोधात लढणारा नेता
काँग्रेसमध्ये मुस्लीम नेतृत्वाचा अभाव?
काँग्रेसच्या एका माजी खासदाराने असा प्रश्न उपस्थित केला की, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या पहिल्या यादीत एकाही मुस्लीम नेत्याची निवड का करण्यात आली नव्हती? पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयावर टीका झाल्यानंतर भरुच जिल्ह्यात एका मुस्लीम नेत्याची नियुक्ती करून त्यांना ही चूक सुधारावी लागली. दरम्यान, शक्तीसिंह गोहिल यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये सहानुभूतीपासून ते नाराजीपर्यंत विविध प्रतिक्रिया उमटल्या. कोणी त्यांच्यावर बुडत्या जहाजातून उडी मारल्याची टीका केली, तर काहींनी त्यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिल्याचं म्हटलं. दरम्यान, गोहिल यांनी स्पष्टीकरण दिलं की, जेव्हा मी अध्यक्ष झालो, तेव्हा पक्षाची अवस्था आणखी वाईट होती. तरीही माझ्या काळात आम्ही बनासकांठा लोकसभा मतदारसंघ जिंकला होता. एका माजी आमदाराने सांगितले की, काँग्रेसमध्ये पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची ही परंपरा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमित चावडा व परेश धनाणी यांनीही राजीनामे दिले होते; पण तरीही पक्षाने त्यांना जवळपास १८ महिने पदावर ठेवले होते.
राहुल गांधींच्या वक्तव्यांवरही कार्यकर्त्यांचा रोष
राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून शादी का घोडा आणि रेस का घोडा असं उपहासात्मक विधान केल्यामुळे अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की, मी पक्षासाठी अनेक दशकं काम केलं; पण अशा वक्तव्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. लोक स्वखर्चाने पक्षासाठी काम करतात. जर स्थानिक नेतृत्वाला अधिकार नसेल आणि दिल्लीहून कोणीतरी येऊन निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहत असेल तर पक्ष कसा उभा राहणार? दरम्यान, विसावदर मतदारसंघात प्रचारासाठी पक्षाने फक्त २० लाख रुपयांचा निधी दिला होता, असं काँग्रेसच्या एका स्टार प्रचारकाने सांगितलं. एक नव्याने पक्ष उभा करण्यासाठी किमान ३०० कोटी रुपये लागतात, हे पैसे कुठून आणायचे? असा प्रश्न काँग्रेसच्या एका युवा नेत्याने उपस्थित केला.