ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसने कन्हैया कुमारला उमेदवारी दिली आहे. ३७ वर्षीय कन्हैया कुमार हा मोदी सरकारच्या विरोधातील आवाज असलेला विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्धीस आला होता. जेएनयूचा विद्यार्थी नेता असताना कन्हैया कुमारवर देशद्रोहाचे आरोप झाले होते. कथित ‘तुकडे तुकडे गँग’चा तो प्रमुख असल्याचा प्रचार त्याच्याविरोधात झाला होता. २० दिवस तिहार तुरुंगात जाऊन आल्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावर अधिकच चर्चेत आला आणि मोदीविरोधी आवाजाचा तरुण आश्वासक चेहरा बनला. दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागलेली असताना कन्हैया कुमारला येथून उमेदवारी देण्यात आल्याने पक्षाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.

भाजपाचे ध्रुवीकरणाचे राजकारण

ईशान्य दिल्लीच्या याच भागात चार वर्षांपूर्वी मोठ्या दंगली झाल्या होत्या. अजूनही त्या दंगलीच्या आठवणी मागे सरलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी नेता राहिलेल्या कन्हैया कुमारला या जागेवरून उमेदवारी देण्यात आल्याने भाजपा याकडे एक संधी म्हणूनच पाहते आहे. ‘कम्युनिस्ट विरुद्ध सनातन धर्म’ या गोष्टीभोवती भाजपा इथले ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. कन्हैया कुमार हा ‘तुकडे तुकडे गँग’चा चेहरा असल्याचे भासविण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. भाजपा अशा ध्रुवीकरणाद्वारे आपल्या बाजूने मते वळविण्याचा प्रयत्न करील, असे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसला दीर्घ पल्ल्याच्या राजकारणासाठी कन्हैयासारखा तरुण चेहरा आवश्यक वाटतो आहे.

हेही वाचा : “ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

काँग्रेसला दिल्लीमध्ये आश्वासक तरुण चेहऱ्याची गरज!

कित्येक दशकांपासून दिल्ली हा काँग्रेसचा गड होता; मात्र आता तो आम आदमी पक्षाच्या ताब्यात आहे. आपच्याच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला दिल्लीमध्ये झालेली पीछेहाट भरून काढण्यासाठी एका चांगल्या चेहऱ्याची गरज आहे. कन्हैयाच्या रूपाने काँग्रेस तो भरून काढण्याच्या विचारात आहे. त्यांनी जर कन्हैयाचा योग्य पद्धतीने वापर केला, तर पक्षाला थोडी उभारी नक्कीच मिळू शकते. उच्चशिक्षित व प्रभावी वक्ता असलेला कन्हैया हा पूर्वांचली चेहरा राष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहे. संसदीय राजकारणामध्ये पाय ठेवण्याच्या दृष्टीने तो गेल्या निवडणुकीपासून प्रयत्न करतो आहे.

दिल्लीच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, “काँग्रेस हाय कमांड राहुल गांधी कन्हैया कुमारकडे काँग्रेसचा एक आश्वासक चेहरा म्हणून पाहतात. आगामी काळात पक्षाची धुरा विचारधारेच्या पातळीवरच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरदेखील या तरुण नेत्याच्या हातात सोपविण्याबाबतही ते विचार करू शकतात.”

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढवली होती निवडणूक

याआधी २०१९ ची निवडणूक कन्हैया कुमारने लढवली होती. तो भारतीय कम्यूनिस्ट पक्षाकडून बिहारमधील बेगुसराय जागेवरून उभा होता; मात्र तो पराभूत झाला. त्यानंतर तो काँग्रेसमध्ये गेला आणि विद्यार्थी नेता ही त्याची प्रतिमा बदलून, स्पष्ट विचारधारा असणारा राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचा तरुण नेता म्हणून तो पुढे आला. सध्या तो काँग्रेसच्या NSUI या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे. त्यामुळे तो काँग्रेस कार्यकारी समितीवरही आहे. तो राहुल गांधींच्या दोन्ही ‘भारत जोडो यात्रां’मध्ये सक्रिय होता.

काँग्रेस आम आदमी पक्षाबरोबर दिल्लीमध्ये लोकसभेची ही निवडणूक लढवत आहे. तीनपैकी ईशान्य दिल्ली या एका जागेवरून त्यांनी कन्हैयाला उमेदवारी दिली आहे. वरिष्ठ नेते व प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख अरविंद सिंग लव्हली आणि माजी मुख्यमंत्री शैला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित हेदेखील या जागेवरून लढायला इच्छुक होते. मात्र, उमेदवारी कन्हैयाला देण्यात आली.

अभिनेता मनोज तिवारी यांचे तगडे आव्हान

अभिनयातून राजकारणात आलेले मनोज तिवारी हे या जागेवरून भाजपाकडून दोन वेळा संसदेत गेले आहेत. तेदेखील पूर्वांचली असून, भाजपाकडून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा तिकीट दिले गेलेले ते एकमेव विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ते विजयी होतील, असा विश्वास भाजपाला नक्कीच आहे. कन्हैया कुमारसमोर मनोज तिवारी यांचे तगडे आव्हान असणार आहे.

कन्हैयाला उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर मनोज तिवारी यांनी त्याच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, तो एक ‘राजकीय पर्यटक’ आहे. “देशाचा आदर करणारा, सैन्य व देशाच्या संस्कृतीबाबत अभिमान असणारा एकही उमेदवार काँग्रेसकडे आता उरला नाही का? त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे पितळ उघडे पडले आहे”, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ते स्पष्टपणे कन्हैयाची देशविरोधी आणि हिंदूविरोधी अशी प्रतिमा तयार करून, ध्रुवीकरण करू पाहत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांना असा विश्वास वाटतो की, कन्हैया त्याच्या मागील निवडणुकीमध्ये चार लाख मतांनी पराभूत झाला असल्यामुळे मनोज तिवारी कन्हैया कुमारचा सहजतेने पाच लाख मतांनी पराभव करतील.

आम आदमी पक्षाचे नेतेदेखील कन्हैया कुमारची कामगिरी जवळून पाहत आहेत. आपच्या एका नेत्याने असे सांगितले की, २०१९-२० मध्ये कन्हैया कुमारला पक्षात घेण्याबाबत आपनेही विचार केला होता; मात्र त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर मग त्याने २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते म्हणाले, “दिल्लीच्या राजकारणात कन्हैया कुमारच्या सक्रिय होण्यामुळे आपसमोर नक्कीच काही प्रश्न उभे राहू शकतात. सध्या लोकसभेबाबत काही अडचण नाही. मात्र, २०२५ च्या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे प्रश्न तीव्र होऊ शकतात. कारण- दोन्हीही पक्ष स्वतंत्रपणे लढतील.”

हेही वाचा : मतदानात महिला पुढे; मग उमेदवारीत मागे का? महिलांना उमेदवारी देण्यात केरळमधील राजकीय पक्षांच्या उदासीनतेचे कारण काय?

बिहार सोडून दिल्लीमधून उमेदवारी का?

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “आपसोबत दिल्लीमध्ये जागावाटप करताना पक्षाला तीनपैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. खरे तर कन्हैया कुमारला बिहारमधूनच उमेदवारी देण्याचा विचार होता. कारण- तो तिथे अधिक प्रसिद्ध आहे. मात्र, इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विचार करता, तसा निर्णय घेतला गेला नाही.”

राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांना एक तरुण नेता म्हणून पुढे आणू पाहत आहे. त्यामुळे बिहारमध्ये कन्हैया कुमारला उमेदवारी देणे योग्य ठरले नसते. त्यामुळे काँग्रेसने ईशान्य दिल्लीमधून कन्हैयाला मैदानात उतरवले आहे. एका नेत्याने असे म्हटले आहे, “काही जणांनी कन्हैयाला दिल्लीतून उमेदवारी देण्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. कन्हैया पूर्वांचल भागातील भूमिहार समाजाचे प्रतिनिधित्व करतो. दिल्लीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय व यादव यांच्यासोबत तुलना करता, भूमिहार समाजाचे लोक फारसे नाहीत. मात्र, पक्षाला असे वाटते की, ईशान्य दिल्लीतील मुस्लीमबहुल भागातून कन्हैयाला अधिक पसंती मिळू शकते.” दुसऱ्या एका नेत्याने म्हटले, “जर राहुल गांधींसारखे प्रमुख नेते त्याच्यावर विश्वास ठेवत असतील आणि पक्षामध्ये येऊन अगदी काही काळच झालेला असतानाही जुन्या लोकांना उमेदवारी देण्याऐवजी त्याला दिली जातेय म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की, काँग्रेसची संपूर्ण संघटनात्मक यंत्रणा त्याच्या पाठीशी उभी राहील.”