एकीकृत जिल्हाध्यक्षांना अधिक अधिकार देण्याच्या गोष्ठी करायच्या आणि दुसरीकडे त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घ्यायचे असा प्रकार सध्या कॉंग्रेसमध्ये सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत मलिक उमेदवाराविरूध्द बंड करणारे याज्ञवल्क्य जिचकार यांचा कॉंग्रेसमध्ये झालेला पुनः प्रवेश नागपूर जिल्हा कॉंग्रेसला विश्वासात न घेता झाल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत दारून पराभव पत्करणा-या कॉंग्रेसने पक्ष बांधणीकडे लक्ष्य केंद्रीत केले होते. दिल्ली येथे राहुल गाँधी यांच्या उपस्थितीत देशभरातील जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षांची बैठक पार पडली. त्यात जिल्हा अध्यक्षांना अधिक अधिकार देण्याचा संकल्प करण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष थेट दिल्लीच्या संपर्कात राहतील, असे सांगितले होते. पण या सर्व गोष्टी फक्त सांगण्यासाठीच होत्या का? कारण अजून ही दिल्लीत बसलेले नेते जिल्हाध्यक्क्षांना न विचारताच स्वमर्जीने कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील बंडखोर नेते याज्ञवल्क्य जी चकार यांची कॉंग्रेस मधील घरवापसी थेट दिल्लीहून झाली. जिल्हा कॉंग्रेस नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष (प्रभारी) बाबा आष्टनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिचकार यांचा पक्ष प्रवेश वरिष्ठांच्या माध्यमातून झाला असे सांगितले.

कोण आहेत याज्ञवल्क्य जिचकार?

कॉंग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे याज्ञवल्क्य चिरंजीव आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली होती. ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटली होती. त्यामुळे याज्ञवल्क्यची उमेदवारी मविआ उमेदवाराच्या विरुद्ध बंडखोरी ठरली. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना निलंबित केले होते. सहा महिन्यात त्यांचे निलंबन मागे घेत त्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉंग्रेस प्रभारी रमेश चैन्नीथला, राज्यसभा सदस्य मुकूल वासनिक हे सर्व पूर्वीचे दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचा याज्ञवल्क्यवर विशेष स्नेह आहे. त्यामुळे त्यांचा थेट पुनर्प्रवेश झाला, अशी चर्चा कॉंग्रेस वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याज्ञवल्क्यच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे कॉंग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी अशी अनेक कॉंग्रेसजणांची मागणी आहे. मात्र त्यांच्या बाबत निर्णय कॉंग्रेसने घेतला नाही. एकूणच कॉंग्रेस नेते कितीही विकेंद्रीकरणाच्या गोष्टी करीत असले तरी दिल्लीत बसलेले नेतेच गल्लीतील पक्ष चालवतात हेच याज्ञवल्क्यच्या पक्ष प्रवेशाने स्पष्ट झाले आहे.