पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यानंतरच उद्योगनगरीचे चित्र स्पष्ट पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक पट्टय़ातील उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरू होत असतानाच मोठय़ा कंपन्यांसह लघुउद्योगांना कुशल तसेच अकुशल कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. दोन महिने ठप्प असणाऱ्या उद्योगनगरीचे खरे चित्र पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत, प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या इतर भागातील उद्योग सुरू करण्यास राज्य सरकारने १४ मे पासून सशर्त परवानगी दिली. सगळी जुळवाजुळव झाल्यानंतर कंपन्यांचा कारभार १८ मे पासून सुरू झाला. दोन महिने उद्योगनगरी ठप्प होती. आता तीन ते चार हजार उद्योग सुरू झाले असल्याचे सांगण्यात येते. सुरुवातीला ३३ टक्के कामगारांनाच मुभा देण्यात आली असून त्यानुसार कामगारांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्य़ाबाहेरील कामगारांना परवानगी नसल्याने स्थानिक कामगारांनाच बोलावून घेण्यात येत आहे. मोठय़ा संख्येने असणारे परप्रांतिय तसेच इतर जिल्ह्य़ातील कामगार आपापल्या मूळ गावी गेले आहेत. परिणामी, कंपन्यांना कामगारांचा तुटवडा जाणवतो आहे. लघुउद्योगांना हीच अडचण अधिक तीव्रतेने भेडसावते आहे. कंपन्यांसाठी निर्धारित केलेल्या काही अटी उद्योजकांना अडचणीच्या वाटत आहेत. प्रत्येकाकडे कामगारांच्या निवासाची व्यवस्था नाही. तसेच, कामगारांच्या वाहतुकीसाठी बस व्यवस्था नाही. शासनाने चारचाकी वाहने वापरण्यास परवानगी दिली असली तरी अनेक कामगारांकडे चारचाकी वाहन नाही, तर दुचाकी वाहने वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामावर यायचे कसे, असा पेच कामगारांपुढे आहे. मोठय़ा कंपन्यांचे बहुतांश कंत्राटदार तसेच कामगार परप्रांतिय आहेत. टाळेबंदीमुळे ही मंडळी त्यांच्या गावी निघून गेली आहेत. ते पुन्हा कामावर यावेत, यासाठी कंपन्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. नुकतेच गावाकडे गेलेले कामगार लगेचच कामावर येतील, याविषयी साशंकता आहे. कंपन्या सुरू होत असल्या तरी, पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल आणि बाजारपेठ खुली होईल, तेव्हाच चित्र स्पष्ट होईल. - अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज