पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीची बारणे यांची मागणी पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत आणि अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्यात आला आहे. पाण्याशी संबंधित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून गेले काही महिने पिंपरी पालिकेला सर्वपक्षीयांनी लक्ष्य केले आहे. पालिका मुख्यालयात आंदोलनांचे सत्र सुरू आहे. काही केल्या पाणीपुरवठय़ात सुधारणा होताना दिसत नसल्याने शहरातील नागरिक हैराण आहेत. पिंपरीतील प्रमुख समस्यांचे निवेदन खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिले, त्यात पाणीसमस्येने शहरवासीय त्रस्त असल्याचे नमूद केले आहे. पवना धरणाच्या क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. दोन पाणी योजनांना मंजुरी मिळालेली आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पालिकेत नवीन गावांचा समावेश झाला असून तिथे वाढीव पाण्याची आवश्यकता आहे. मुळातच शहरातील नागरिकांनाच कित्येक दिवसांपासून पाणीसमस्या भेडसावते आहे, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले असून या संदर्भात शासनस्तरावर बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शास्तीकर पूर्ण माफ करण्याची मागणी शास्तीकराच्या जाचातून पिंपरी-चिंचवडकरांची मुक्तता झालेली नाही. शास्तीकराला सरसकट माफी देऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा. भाजप सरकारने १५०० चौरस फुटांपर्यंतचा शास्तीकर माफ केला होता. मात्र, तो पूर्णपणे माफ करण्यात यावा, अशीही मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.