पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर येथे दिला. शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपला पाठिंबा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. आघाडीचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर येथील कापड बाजारात पाटील आणि अमोल मिटकरी यांची सभा झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगराध्यक्षा वैशाली वाखारे आदी त्या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पक्षातून अनेकजण बाहेर पडत असल्याचे मला विचारले जाते. पण, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शरद पवार यांचे सच्चे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने काम करून राज्यात सत्ता संपादन करणार आहेत. मिटकरी म्हणाले की, शिरूर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होणार आहे. सत्ताधारी विचारतात शरद पवार यांनी काय केले. कांद्याला बाजारभाव का नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय, हा त्यांना आमचा सवाल आहे. राज्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत. हे सरकार संवेदनशील नाही.