पुणे जिल्हा भगवा करू, अशी भाषा शिवसेनेचे नेते करत होते. प्रत्यक्षात जिल्ह्य़ातून एकही जागा शिवसेनेला निवडून आणता आली नाही, याचे शिवसेना नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांना उद्देशून दिला. आंबेगाव – शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. मंचर येथे झालेल्या या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, अशोक पवार, अतुल बेनके, चेतन तुपे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. कोल्हे म्हणाले की, या निवडणुकीत शरद पवार यांचा करिष्मा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ते मैदानात उतरल्याने झंझावात निर्माण झाला. शिरूर लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच आमदार निवडून आले, त्याची रंगीत तालीम लोकसभा निवडणुकीतच झाली होती. आपण खासदारपदी निवडून येण्यात या पाचही आमदारांचे श्रेय मोठे होते. प्रचारादरम्यान भाजपकडून अनेक वल्गना करण्यात आल्या. जनतेने त्यांना १०५ जागांवरच थांबवून योग्य तो संदेश दिला. भाजपला फक्त खुर्चीची हाव असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या, महाराष्ट्रातील प्रश्न दिसत नाही, अशी टीका कोल्हे यांनी केली. पाचही आमदारांच्या सहकार्याने शिरूर लोकसभेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.