पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्याचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुखसागर नगर परिसरातील गल्ली क्रमांक एक येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघांनी गुरूवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे ( ६ वर्ष) आणि अंतरा अतुल शिंदे ( ३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा आणि आजूबाजूला चौकशी सुरू केली आहे.

अतुल आणि जया यांचा २०१३ मध्ये प्रेम विवाह झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अतुल शिंदे हे आय कार्ड तयार करण्याचा व्यवसाय करीत होते.