पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा अजब फतवा काढण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांसाठी हा फतवा काढण्यात आला आहे. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदाच्या वर्षी वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यासाठी एक नियमावली करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेता कामा नये. तसेच शासनविरोधी कृत्य करू करता कामा नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रविरोधी, समाज, जातीयविरोधी आणि राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये असंही सांगण्यात आलं आहे. हे सर्व नियम मान्य असल्याचं हमीपत्र दिल्यानंतरच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. नियमांचे पालन न केल्यास वसतिगृहातील प्रवेश होणार रद्द होणार असल्याचे विद्यापीठाकडून सागंण्यात आलं आहे. या आदेशानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विद्यापीठ परिसरात राजकीय पक्षाचे काम नको - विनोद तावडे तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय भूमिका असायला हरकत नाही. मात्र ती विद्यापीठ परिसराच्या बाहेर असावी. तसेच विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न निश्चित मांडावे. मात्र राजकीय पक्षाचे काम विद्यापीठ परिसरात नको असं मत व्यक्त केलं.