पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येत असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत गुरुवारी संपली. या मुदतीत पुणे विभागातील २ लाख १९ हजार १५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, विभागातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणीही केली नसल्याचे दिसून येते.
शिक्षण विभागाने अकरावीच्या नोंदणीबाबतची माहिती दिली. अकरावी प्रवेशासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. अल्पसंख्याक आणि इनहाउस कोटा प्रवेशात केलेल्या बदलांमुळे नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पुणे विभागात एकूण २ लाख १९ हजार १५४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. पुणे विभागात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागातील नोंदणीत पुणे जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ८५३, अहिल्यानगर जिल्ह्यातील ५२ हजार २३२, सोलापूर जिल्ह्यातील ४७ हजार ६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यंदा राज्य मंडळाच्या पुणे विभागात दहावीच्या २ लाख ६३ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २ लाख ४९ हजार ५०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. दहावीनंतर विद्यार्थी अकरावी प्रवेशासह आयटीआय, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांनाही पसंती देतात. त्यामुळे पुणे विभागातील उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २ लाख १९ हजार १५४ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली, तर सुमारे ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचे दिसून येत आहे.