संदीप आचार्य
करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातल्यानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाचे महत्व अधोरेखित झाले आहे. देशाचा विचार करता राज्यात करोनाबाधित सर्वाधिक मृ्त्यूंची नोंद झाली असून या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी पुणे येथे २०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
देशभरात करोनाचे आजपर्यंत ८१ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले तर एक लाख ४८ हजार ९४७ रुग्णांचे मृत्यू झाले. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. करोनाला अटकाव करताना राज्य सरकारला अनेक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागली होती. राज्यात हिवताप, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूसह वेगवेगळे साथीचे आजार एकीकडे तर वाढते असंसर्गजन्य आजार दुसरीकडे असे चित्र आहे. मात्र गेल्या दशकात साथीच्या आजारांपेक्षा मधुमेह व उच्च रक्तदाबासह असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढ गेल्यामुळे केंद्र शासनासह राज्यांनी असंसर्गजन्य आजार रोखण्याला प्राधान्य दिले होते. मात्र करोना आला आणि भारतासह संपूर्ण जगाचेच गणित बदलून गेले. गोल्या दोन वर्षात करोनाची अनेक रुपे समोर आल्यामुळे भविष्यातील साथरोग आजारांचा विचार करून जगभरातील अनेक देशांनी सुसज्ज प्रयोगशाळा तसेच साथरोग रुग्णालये उभारण्याचा विचार सुरु केला. राज्याच्या आरोग्य विभागाने साथरोग आजाराचा मुकाबला करण्याची अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच साथरोग रुग्णालय उभारण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. यातूनच सुरुवातीला पुणे येथील औंध उरो रुग्णालयाची जागा साथरोग रुग्णालय उभारण्यासाठी निश्चित करण्यात आली होती. याशिवाय मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय हेही संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांसाठी अधिग्रहित करण्याची योजना असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. औंध उरो रुग्णालयात ६०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार होत्या. यात पहिल्या टप्प्यात २०० खाटांची व्यवस्था केली जाणार होती. मात्र औंध येथील रुग्णालयाच्या जागेची पाहणी केल्यानंतर सदर जागेऐवजी पुणे येथील डॉ. बंदोरवाला आशासकीय रुग्णालयातील पाच हेक्टर जागेवर संसर्गजन्यरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालय उभारणीसाठीचा सविस्तर प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असून तो मान्यतेसाठी आरोग्यमंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात २०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार असून पुढील टप्प्यात ५०० खाटांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील २०० खाटांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून मेंदुच्या आजारावरील रुग्णांसाठी २० खाटा, श्वसन आजारासाठी २० खाटा तर तापाच्या रुग्णांसाठी २० खाटा आणि लहान मुलांसाठी १० खाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. रुग्णालय उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या ठिकाणी साथरोग प्रशिक्षण, संशोधन, उपचार व संदर्भ सेवा यांची व्यवस्था असणार आहे. तसेच साथीच्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी डॉक्टर- परिचारिकांना प्रशिक्षण तसेच परिणामकारकपणे कामाचे नियोजन करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतातील साथीच्या आजाराप्रमाणे जगभरातील साथीचे आजार व उपचार तसेच संशोधन कामावर या साथरोग रुग्णालयातील संशोधन केंद्रातून अभ्यास केला जाणार आहे.
