पुणे : राज्यातील कारागृहात कैद्यांसाठी खाद्यपदार्थ, किराणा माल आणि विद्युत उपकरणे यांंसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत ५०० कोटींंहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. या घोटाळ्यात राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

केंद्रीकृत पद्धतीने करण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत विशिष्ट व्यापाऱ्यांची मक्तेदारी दिसते. त्यामुळे बाजारात ३०-३५ रूपयांना मिळणारा गहू ४५.९ रूपये दराने, ३५ रूपये किमतीचा तांदूळ ४४.९ रूपये तर, १०० रूपये किलोेने मिळणारी तूरदाळ २०९ रूपये दराने कारागृहातील कैद्यांसाठी खरेदी केली जाते. २०२४ पासून आतापर्यंत केलल्या या वस्तूंंच्या खरेदीत सुमारे ५००कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येते, असा आरोप शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असते. कैद्यांसाठी गहू, तांदूळ, साखर, डाळी, दुध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन-मटण, अंडी आणि बेकरी पदार्थ यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यात येते. मात्र, ही खरेदी करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य बाजार भावापेक्षा अधिकच्या दराने खरेदी करण्यात येते. गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत, मुदतबाह्य, निकृष्ठ, बुरशीजन्य माल पुरवला जातो. कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी याबाबतचा लेखी अहवाल देवूनही कारवाई केली जात नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध

शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसून शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्यासोबतच देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या खिशातूनही या मार्गासाठी लागलेले पैसे टोलच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनीच या महामार्गाला विरोध करावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.