राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही लोक समाजात दंगली निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी बोलताना गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल अशी महाराष्ट्रात धमक असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं. अजित पवार यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ स्मारकाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रेरणा मिळते. त्यांचा आदर्श घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. देशावर दिल्लीवर संकट आलं, त्या त्यावेळी महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. यापुढं देखील, आपल्या देशावर जेव्हा, जेव्हा संकट येईल, देश वाचवण्यासाठी वेळ येईल तेव्हा महाराष्ट्र नक्की मदतीला धावून जाईल असा विश्वास आहे.”

“गरज पडली तर महाराष्ट्र दिल्लीत कोणालाही टक्कर देईल. ही धमक महाराष्ट्रात आहे असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो विसरता येणार नाही. शरद पवार नेहमी सांगतात, महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकलेला नाही. यापुढं झुकणार देखील नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढं जायचं आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“ज्यावेळी दंगली होतात, त्यावेळी…”

अजित पवार म्हणाले, “बाकीच्या राज्यांना मोगलांच्या राज्य, आदिलशहा, निजामशाहींचं, कुतुबशाहींचं राज्य संबोधलं जातं. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याला भोसलेंचं राज्य म्हटलं जात नाही. या राज्याला रयतेचं, हिंदवी स्वराज्य म्हणायचं महाराजांनी शिकवलं आहे. परंतु, काही माणसं राजकीय फायद्यांकरिता, समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतात. अंतर पाडण्याचं काम करतात. ते प्रक्षोभक भाषणं करतात.”

“काही गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्यात. त्यावेळी कोणी बोललं नाही, आता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नांदत असताना, वेगळं कसं घडेल याबद्दलचा प्रयत्न चालला आहे. हा प्रयत्न तुम्हाला आम्हाला हाणून पाडावा लागेल. यातून तुमचं माझं, राज्याचं भल होणार नाही. ज्या वेळी दंगली होतात, त्यावेळी गोर-गरिबाला किंमत मोजावी लागते. अनेकांच्या चुली बंद पडतील. ज्याची चांगली परिस्थिती आहे तो ८-१० दिवस घरात राहू शकतो. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. आपण सर्व गुण्या-गोविंदाने राहतो. त्याला कुठंही डाग लागू देऊ नका, दृष्ट लागू देऊ नका.

हेही वाचा :

“…म्हणून निवडणूका पुढे ढकलल्या”

“ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून निवडणूका पुढं ढकलल्या. पुणे जिल्ह्यातील आठ मार्केट कमिटी येथे प्रशासक नेमले जातील. त्याही निवडणूक उद्याच्या काळात घ्यायच्या आहेत. आज निवडणुका झाल्या, तर ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार नाही. हे बरोबर नाही. हे आम्हाला पटलं नाही म्हणून आम्ही सभागृहात एकमताने ठराव केला आणि निवडणूका पुढे ढकलल्या,” असंही नमूद करण्यात आलं.