पिंपरी : ‘आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. आम्हीही तयारी करत आहोत, महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे. युती की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) परिवार मिलन कार्यक्रमासाठी पिंपरीत आले असताना पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, ‘महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत. त्यासाठी दोन दिवस शहरातील परिवार मिलन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. जनसंवादच्या माध्यमातून प्रश्न जाणून घेतले. प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावले. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. तसेच, महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे.’

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत पवार म्हणाले, ‘अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत, ठोकशाही केली जाऊ नये.’ मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी इशारा दिल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ज्या मागण्या आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत बसवत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

‘मी जोतिषी नाही’

महापालिका की जिल्हा परिषद निवडणूक अगोदर होणार? असे विचारले असता, पवार म्हणाले, ‘मी ज्योतिषी नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल. निवडणुका स्वबळावर लढायचे की नाही, याबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक पातळीवर नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि सर्वांशी चर्चा केली जाईल. परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर पक्ष आणि कार्यकर्ते हिताचा निर्णय घेतला जाईल.’

‘तुम्हाला काय अडचण?’

अजित पवार यांची शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि मुलगा ऋषिकेश वाघेरे यांनी भेट घेतली. संजोग वाघेरे पक्षात येणार का? या प्रश्नावर पवारांनी मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, ‘संजोग ठाकरे गटामध्ये आहे. उषा आमच्याबरोबर आहे. तुम्हाला काय अडचण आहे. संजोगला विचारसरणी पटली म्हणून तो तिकडे आहे. उषाला आमची विचारसरणी पटली. म्हणून त्या माझ्याबरोबर आहेत. अनेकांच्या घरात अशीच स्थिती आहे. अगदी आमच्यासह खूप उदाहरणे देता येतील.’