पुणे : ‘यूपीएससी, एमपीएससीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रशासनात लोकाभिमुख काम केले पाहिजे. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना मदत करणे आवश्यक आहे,’ असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,’ अशी ग्वाही दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेतील नऊ, एमपीएससी परीक्षेतील ९१ यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘सारथी’च्या यशोगाथांवर आधारित ‘विजयी भव’ व ‘सारथी उपक्रम माहिती’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
पवार म्हणाले, ‘विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी ‘सारथी’च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच, संस्थेचा नावलौकिक वाढवा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसे काम विद्यार्थ्यांनी करावे. संस्थेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रांतिकारी सामाजिक कार्य विसरता येणार नाही. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था या सर्वांच्या कार्याचा आदर्श राजर्षी छत्रपती शाहू महाराजच आहेत.’
‘राज्यात १९८० च्या दशकात यूपीएससी, एमपीएससीमध्ये निवड होण्याचे प्रमाण हे नगण्य होते. गेल्या चार ते पाच वर्षांत त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात सारथी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात उत्तोमत्तम प्रशासकीय अधिकारी तयार होऊन महाराष्ट्राच्या विकासास मोठी गती देतील,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.