लशींचा पुरवठा सुरळीत राखण्याचे आवाहन
पुणे : करोना महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुविधा उपलब्ध झाल्याने लसीकरणाचा वेगही लक्षणीय वाढला आहे, मात्र हा वेग कायम राहण्यासाठी लशींचा साठा सुरळीत राहणे आवश्यक असल्याचे खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे.
जानेवारी महिन्यात देशातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्यसेवक, दुसऱ्या टप्प्यात आघाडीचे कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील वयाचे ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधीग्रस्तांचे लसीकरण सुरू झाले. संसर्गाची व्याप्ती पहाता चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मे महिन्याच्या सुरुवातीपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले मात्र, मर्यादित साठ्यामुळे सुरुवातीला या वयातील लसीकरण अपेक्षित वेग साध्य करू शकले नाही. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनुरकर म्हणाले, २३ मे च्या दरम्यान संजीवन रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत सुमारे २१ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. साथीचा वेग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. थेट उत्पादकांकडून लस घेऊन आम्ही लसीकरण करत आहोत, हा पुरवठा सुरळीत राहिला असता लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखणे शक्य आहे.
सह्याद्री रुग्णालयाच्या सर्व शाखांमध्ये २२ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले. १५ जूनपर्यंत सुमारे ५५ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लशींचा पुरवठा सध्या सुरळीत आहे, मात्र मागणी तेवढा पुरवठा झाला असता लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवणे शक्य आहे, असेही रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरी तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्यावर मात करण्यासाठी वेगवान लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. नावनोंदणीची अट काढून सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याची गरज आहे, असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.