लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून १६ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या संचालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत डॉ. जयदीप शंकरराव जाधव (वय ५० रा. कस्पटे वस्ती रस्ता, वाकड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा. आनंदबन सोसायटी, रावेत) यांच्यासह अन्य संचालकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… लोणावळा: मंकी हिलच्या दरीत पाय घसरुन पडला… झाडाच्या फांदीत अडकल्याने बचावला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी डाॅ. जाधव यांना एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स एलएलपी या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. डाॅ. जाधव यांनी ८६ लाख रुपये आणि त्यांच्या नातेवाईकांनी १५ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या योजनेत केली होती. आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून करार करुन घेतला होता. आरोपींनी परतावा न देता फिर्यादी डाॅ. जाधव यांच्यासह गुंतवणुकदारांची सुमारे १६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी अशा प्रकारे शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.