बारामती : ‘पहिलीपासून मातृभाषा आणि पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा. पाचवीनंतर कोणती भाषा घ्यायची, हे पालकांनी ठरवावे,’ अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बाेलताना अजित पवार म्हणाले, ‘अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे. पहिलीपासून मातृभाषा असली पाहिजे, याबाबत दुमत नाही. मात्र, इतर भाषांचा समावेश पाचवीपासून करण्यात यावा. मराठी भाषा सक्तीची आहे. पाचवीनंतर कोणती भाषा घ्यावी, हे पालकांनी ठरवावे.’

बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या प्रकरणाबाबत पवार म्हणाले, ‘याबाबत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.’

‘… म्हणून निवडणूक घ्यावी लागली’

‘माळेगाव’ निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. मात्र, तावरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सहा जागांची मागणी करण्यात आली. त्या पक्षाचे तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप आले होते. त्यांना दोन जागा देण्याची तयारी दर्शविली होती. तसेच एक स्वीकृत संचालक नेमण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, राजवर्धन शिंदे यांनी असहमती दर्शविली. ते नवीन मुद्दे काढू लागल्याने निवडणूक घ्यावी लागली, असे अजित पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मला अध्यक्ष व्हायचे नव्हते, पण…’

‘माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत टोकाची भूमिका घेतली नव्हती. मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र, अध्यक्षपदासाठी सहा ते सात जण इच्छुक असल्याने अध्यक्षपदासाठी माझे नाव जाहीर करावे लागले,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.