बारामती : अतिवृष्टीमुळे बारामतीसह राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शेतकऱ्यांना थोडी कळ सोसावी लागेल, ही मदत तत्काळ दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती परिसरात मागील तीन-चार दिवसांत अतिवृष्टी झाली. तसेच बारामतीतून वाहणारा नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात आणि शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारीही त्यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यावेळी पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,‘नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत. बारामतीसह राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल. ही मदत लगेच मिळणार नाही.’
दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
बारामती तालुक्यातील दोन हजार हेक्टरवरील पिकांचे, तर १ हजार ३०० नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. दोन हजार कोंबड्यांची पिल्ले, दीडशे कोंबड्या, १५ शेळ्या, मेंढया मृत्यू झाले निदर्शनास आले आहे. बारामती तालुक्यातील १ हजार २०० कुटुंबांना मोफत अन्न धान्य देण्यात आले असून, अद्याप वाटप सुरू असल्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १४ बाधितांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत दोन लाख ३१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. सानुग्रह अनुदान पंचनामे झाल्यानंतर देण्यात येईल. – गणेश शिंदे, तहसीलदार, बारामती