पुणे : विमानसेवा देणाऱ्या एका कंंपनीच्या सेवेत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या कंपनीच्या वतीने दिला जाणाऱ्या सेवेबाबत समाजमाध्यमांवर अनेकदा तक्रारी होऊन देखील या कंपनीच्या सेवेत सुधारणा होत नाही. संबंधित कंपनीने विमान प्रवासात पत्नीला माझ्या शेजारचे आसन दिले नाही. कार्यतत्पर मंत्री म्हणून यामध्ये लक्ष घालावे’ अशी विनंती भाजपच्या प्रवक्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
विमान कंपनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा किती खालावलेला आहे, याची सविस्तर माहिती देत या विमान कंपनीच्या त्रासाची तक्रार भाजपचे पदाधिकारी आणि प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. कंपनीच्या सेवेत अनेक त्रुटी असल्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी प्रवाशांना सहकार्य न करता उलट ‘कोणाकडे तक्रार करायची त्यांच्याकडे करा ‘ असे उत्तर देत असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.
संबंधित कंपनीच्या विमानातून प्रवास करताना आलेले अनुभव भाजपचे प्रवक्ते खर्डेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना पत्र लिहून कळविले आहेत. विमानातून प्रवास करताना आसन व्यवस्था चांगली नसते. प्रवाशांच्या बॅगची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. विमान कंपनीचे पोर्टर प्रवाशांच्या बॅगेजची योग्य पद्धतीने हाताळणी करत नाहीत. त्यामुळे बॅग खराब होतात तसेच काही चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत.
लांबच्या प्रवासात पती आणि पत्नीला जवळची आसन न देता वेगवेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले जातात. याचा अनुभव मुंबई ते नैरोबी प्रवासात स्वतःला देखील आला. विमानतळावर चेक इन करताना पती-पत्नीला वेगवेगळ्या सीट दिल्या जातात. या प्रवासात पत्नीला वेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले. जवळजवळ आसन देण्याची विनंती कंपनीच्या प्रतिनिधींना केली असता ‘मी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, सह प्रवाशांशी बोलून जागा बदलून घ्या’ अशी उलट उत्तरे देण्यात आल्याचे खर्डेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
पैसा कमविण्याच्या नादात संबंधित विमान कंपनी ऑनलाईन सीट कन्फर्मेशन करताना खिडकीच्या किंवा पुढच्या पसंतीच्या सीटसाठी अतिरिक्त पैसे घेते. विमान प्रवासात प्रवाशांचे सामान (लगेज) चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेत नाही. आदळ आपट करत लगेज टाकले जात असल्याने अनेकदा बॅगचे नुकसान होते. कंपनीकडून प्रवासात येणारे अनुभव हे अत्यंत क्लेशदायक असून संबंधित कंंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
मराठीकडे दुर्लक्ष
या विमान कंपनीचे कोणतेही कर्मचारी प्रवासा दरम्यान मराठीत बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडून विमानात दिल्या जाणाऱ्या माहितीसाठी देखील मराठी भाषेचा वापर केला जात नाही. किमान महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानात एका कर्मचाऱ्याने तरी मराठी बोलावे, अशी अपेक्षा आहे. याबाबतही संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना कराव्यात, असेही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पाठवलेला पत्रात म्हटले आहे.