Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१४ जून) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार एका कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून मोठा गोंधळ घातला आहे. यावेळी प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह माजी आमदार बच्चू कडू यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्या यासाठी अजित पवार यांच्या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील एका कार्यक्रमात संबोधित करत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आणि बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे केलेल्या १७ मागण्यांवरून घोषणाबाजी केली. तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कार्यक्रमात घोषणा दिल्या आणि अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता अजित पवार यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, “बच्चू कडू यांच्या उपोषणासंदर्भात आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा केली. तसेच बच्चू कडू यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत एक समिती तयार करू, त्या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश करू आणि त्यानंतर ती समिती जो अहवाल सरकारला देईल त्यानंतर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना आश्वासन दिलं आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू काय म्हणाले?

“कर्जमाफीबाबत लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता. आम्हाला सरकारने सांगितलं की आम्ही एक उच्चस्तरिय समिती नेमणार आहे. त्यानंतर त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीबाबत तुम्ही निर्णय घेणार, मग तुम्ही याबाबतचा निर्णय नेमकं कोणत्या तारखेला घेणार आहात? त्यासाठी किती दिवस लागतील हे सरकार सांगत नाही. त्यामुळे आम्ही प्रहारचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसलो आहोत. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आजची बैठक होईपर्यंत काहीही करू नये. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास माझी इच्छा आहे की १६ तारखेपासून जलत्याग करावं आणि आंदोलन आणखी तीव्र करावं”, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.