पुणे : शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ट्रकच्या धडकेत पोलिसांच्या गाडीसह दहा वाहनांचे नुकसान

काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाधव म्हणाले, मार्च महिन्याच्या अखेरीस पुतळा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड या किल्ल्यांवरील माती आणि पाणी भूमिपूजनासाठी नेण्यात येणार आहे. शिरोळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने शत्रूंना पळवून लावले. त्यांच्या गनिमी काव्याचा आदर्श जगभरातील विविध देशांनी घेतला आहे. सीमेवरील भारतीय जवानांना शिवरायांचा आदर्श आणि त्याद्वारे स्फूर्ती मिळावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भारत पाकिस्तान सीमेवर स्थापन करण्यात येत आहे.