पुणे : ‘बदलती जीवनशैली आणि वाढते तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचे संकट हे सध्या मोठे आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत,’ अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘प्राज’चे संस्थापक आणि इथेनॉल मॅन डॉ. प्रमोद चौधरी यांच्या उद्योजकीय प्रवासावर आधारित असलेल्या ‘पैलतीरावरून… तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ‘प्राज’चे अध्यक्ष अतुल मुळे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विशाल सोनी व्यासपीठावर उपस्थित होते. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

फडणवीस म्हणाले, ‘प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यामुळे तयार होणाऱ्या कार्बनमुळेदेखील भविष्यकाळात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संशोधन करतानाही पर्यावरणाचे संरक्षण कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. ‘प्राज’ कंपनीने हेच आपल्या कामातून दाखवून दिले आहे.’

‘उद्योजक म्हणून काम करताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच उद्योगात नुकसान झाल्यानंतर डगमगून न जाता त्यावर केलेली मात याची माहिती डॉ. चौधरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यांच्या लेखनाचा उपयोग तरुण पिढीला आणि उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना होईल,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘संकटे येताना एकाच वेळी तीन ते चार पाठोपाठ येत असतात. मात्र, त्याला सामोरे जाणाराच यशस्वी होत असतो, हे ‘प्राज’चे डॉ. प्रमोद चौधरी यांचे काम बघून कळते,’ अशा शब्दांत त्यांनी चौधरी यांचे कौतुक केले. जोशी, चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुढच्या पिढीला काय देऊन जातो हे महत्त्वाचे’

‘जीवनामध्ये पुढच्या पिढीला काय देतो हे महत्त्वाचे असते. जे येणाऱ्या पिढीचा विचार करून त्यांच्या हिताचे काम करतात, त्यांनाच जग लक्षात ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, परकीय आक्रमणापासून आपल्याला मुक्तता दिली म्हणूनच आजही त्यांचा ३५१वा राज्यभिषेकदिन तेवढ्याच उत्साहाने आपण साजरा करतो. तुम्ही येणाऱ्या पिढीला काय देता, हे अत्यंत महत्त्वाचे असते,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.